अकरावीसाठी जागा बक्कळ; प्रवेशाचा ऑनलाईन गोंधळ!

Application Online College Form Concept

सुस्त वेबसाइटमुळे ठाणेकर विद्यार्थी-पालक हैराण

ठाणे: दहावीत उत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्यांपेक्षा ठाणे जिल्ह्यात अकरावीसाठी विविध शाखेच्या जागा बक्कळ असल्याने प्रवेशापासून कोणीही वंचित राहणार नसल्याचे चित्र स्पष्ट झाले आहे, मात्र वेबसाईट कासवगतीने काम करत असल्याने विद्यार्थी आणि पालकांची चिंता वाढली आहे. वेळेवर कागदपत्रे अपलोड करता आली नाहीत तर प्रवेशापासून वंचित राहण्याची भीती त्यांना सतावू लागली आहे.

ठाणे जिल्ह्यातून सुमारे एक लाख आठ हजार विद्यार्थी दहावी शालांत परीक्षा उत्तीर्ण झाले आहेत. तर जिल्ह्यात अकरावी प्रवेशासाठी विविध शाखेच्या तब्बल एक लाख ५६ हजाराहून अधिक जागा उपलब्ध आहेत. मात्र मुबलक जागा असूनही विद्यार्थ्यांची प्रवेशासाठी कसोटी लागणार आहे.

महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळातर्पेâ घेण्यात आलेल्या दहावी परीक्षेत ठाणे जिल्ह्यातील एक लाख १३,३२८ विद्यार्थ्यांपैकी एक लाख ८३११ विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहेत. १४ मे रोजी निकाल लागल्यानंतर अकरावी प्रवेश प्रक्रीयेला १९ मे पासून सुरूवात होणार होती. पण राज्य शासनाचे पोर्टल बंद पडल्यामुळे ही प्रवेश प्रक्रीया पुढे ढकलण्यात आली. नवीन वेळापत्रकानुसार आता ही प्रक्रीया २६ मे पासून सुरू झाली आहे. पण जिल्ह्यातील अनेक शाळांमध्ये मार्कशिट, रिझर्ल्ट आणि लिव्हींग सर्टीफिकेट मिळण्यास विलंब झाला असल्याचे उघडकीस आले आहे. हजारो विद्यार्थ्यांच्या हाती संकेतस्थळावर नोंदणी करण्याच्या दिवशी निकाल हाती आला. त्यात शासनाने दिलेल्या संकेतस्थळाची गती मंदावल्यामुळे पहिल्या दिवशी प्रवेश नोंदणीला ठाणे जिल्ह्यातून अत्यल्प प्रतिसाद मिळाला असल्याची माहिती जिल्हा परिषदेच्या शिक्षण विभागाकडून मिळाली आहे.

जिल्ह्यातील ४५४ कनिष्ठ महाविद्यालयांनी या प्रवेश प्रक्रीयेत सहभाग घेतला आहे. मात्र कोणत्या महाविद्यालयात कोणत्या विभागात किती जागा आहेत, याची माहिती खुद्द शिक्षण विभागाकडेही नसल्याचे या निमित्ताने उघडकीस आले आहे. राज्य शासनाच्या संकेतस्थळावर ही माहिती टाकण्यात आली नसल्याचे उत्तर प्रशासनाकडून मिळत आहे. पण मिळालेल्या माहितीनुसार यावर्षीही महामुंबई परिक्षेत्रामध्ये अकरावी प्रवेशासाठी मुबलक जागा उपलब्ध आहेत. यामध्ये ठाणे जिल्ह्यातील विविध महाविद्यालयांमध्ये सुमारे एक लाख ५६,४४० जागा असल्याची आकडेवारी हाती आली आहे. म्हणजे उत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्यांच्या तुलनेत ठाण्यात ४८ हजार जागा अधिक आहेत. तर मुंबईमध्ये एक लाख ९८,१७० जागा आहेत. त्यामुळे मुंबईतील विद्यार्थी ठाणे शहरासह जिल्ह्यातील महाविद्यालयांनाही पसंती देणार असल्याचे दिसते. एकूणच मुबलक जागा असूनही ठाणेकर विद्यार्थ्यांना पसंतीच्या महाविद्यालयामध्ये प्रवेश घेताना अडचणी निर्माण होण्याची शक्यता नाकारता येत नाही.

ठाणे जिल्ह्यात शाखनिहाय जागा
कला- २५,८६०
वाणिज्य- ७१,२४०
विज्ञान- ५९,३४०

मुदतीत नोंदणी करण्याचे आवाहन
विद्यार्थ्यांची अकरावी प्रवेश प्रक्रीया ही संपूर्णता ऑनलाईन आहे. त्यामुळे पालक व विद्यार्थ्यांनी दिलेल्या मुदतीत ऑनलाईन अर्ज भरून त्या शाखांमध्ये प्रवेश घ्यावा, असे आवाहन जिल्हा परिषदेच्या शिक्षण विभागाने केले आहे.

सुधारीत वेळापत्रक
* २६ मे ते ३ जून नोंदणी व अर्ज सादर
* ५ जून तात्पुरती गुणवत्ता यादी
* ६ ते ७ जून हरती व दुरुस्ती सादर करणे
* ८ जून अंतीम गुणवत्ता यादी
* ९ जून कोटा फेरी प्रवेश
* ११ ते १८ जून पहिली प्रवेश प्रक्रीया
* २० जून दुसर्‍या फेरीसाठी जागा
* नोंदणी, अर्ज, माहितीसाठी अधिकृत संकेतस्थळे
* [https://mahafyjcadmissions.in](https://mahafyjcadmissions.in)
mahafyjcadmissions.in
* हेल्पलाईन नंबर: ८५३०९५५५६४