ठाणे: माध्यमाचे स्वरुप कालानुरूप बदलत जाणार परंतु विश्वासार्हता आणि वाचनियता यांचे महत्व अबाधित राहिले तरच माध्यमांकडे जनता आकर्षित होत राहणार, असे मत ठाणेवैभवचे संपादक मिलिंद बल्लाळ यांनी व्यक्त केले.
ठाण्यातील उपवन-गावंड बाग परिसरातील चिंतामणी गावंड बाग उपवन ज्येष्ठ नागरिक सामाजिक संस्थेने रविवारी ‘माध्यमांचे बदलते स्वरूप’ या विषयावर श्री. बल्लाळ यांचे व्याख्यान आयोजित केले होते.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक व पाहुण्यांचे स्वागत संस्थेचे अध्यक्ष सदाशिव देशमुख (रिटायर्ड डिस्ट्रीक्ट जज्ज) यांनी केले. पाहुण्यांची ओळख घनश्याम दीक्षित यांनी करून दिली. कार्यक्रमाला संस्थेचे सभासद मोठ्या संख्येने उपस्थित होते.
मिलिंद बल्लाळ यांनी आपल्या भाषणात, एकंदरच माध्यमांच्या बदलत्या स्वरूपाचा सर्वंकष आढावा घेतला. प्रथम प्रिंट मीडिया म्हणजेच वृत्तपत्र क्षेत्राबद्दल ते बोलले. वृत्तपत्रांचे बदलते स्वरूप, पूर्वी आणि सध्या येणाऱ्या अडचणी, इ. बद्दल त्यांनी सविस्तर माहिती दिली. विशेषतः बदलते पत्रकार आणि एकंदरच पत्रकारितेबद्दल त्यांनी गंभीर विवेचन केले. स्वातंत्र्यपूर्व काळात मुख्यत्वे करून, स्वातंत्र्यप्राप्ती आणि समाज सुधारणा, या गोष्टी समोर ठेवून वृत्तपत्रे निर्माण झाली होती. त्या वेळच्या दिग्गज माननीय संपादकांचा म्हणजेच लो.टिळक, समाजसुधारक आगरकर, बाबासाहेब आंबेडकर आदिंचा त्यांनी विशेष उल्लेख केला. त्या वेळच्या पत्रकारांनी पत्रकारिता हे एक व्रत समजून कार्य केले. मात्र आजची पत्रकारिता बऱ्याच अंशी व्यावसायिक उद्देश डोळ्यासमोर ठेऊन केली जाते, असा उल्लेख खेदाने केला. वृत्तपत्र हे वाचकांपेक्षा जाहिरातदारांची सोय पाहते का असा अस्वस्थ करणारा प्रश्न श्री. बल्लाळ यांनी उपस्थित केला. पण त्यालाही नाईलाज असतो, कारण एकंदरच वृत्तपत्र व्यवसायाचे अर्थकारण बदलले आहे, असे ते म्हणाले. एकेकाळी आकाशवाणी या माध्यमाने सुद्धा विविध विषयांवर कार्यक्रम करून श्रोत्यांवर अनेक वर्षे चांगले संस्कार केले, असा उल्लेखही त्यांनी आवर्जून केला. नंतर तंत्रज्ञानात अनेक बदल झाल्याने माध्यमांच्या स्वरूपात काळानुरूप बदल झाले.
प्रसार माध्यमांमध्ये दृकश्राव्य माध्यमांनी क्रांती घडवून आणली. त्या वेळेची बातमी त्या वेळीच मिळायला लागली आणि त्यामुळे वृत्तपत्रामध्ये दुसऱ्या दिवशी येणारी बातमी शिळी होऊ लागली. पण तरीही आजही वृत्तपत्राचे स्थान वेगळे आहे. इंटरनेट आल्यामुळे बातम्या मिळणे आणखीनच जलद झाले आहे. पण दृकश्राव्य माध्यमातील पत्रकार हे बातमी देताना तारतम्य कमी बाळगतात असेही त्यांनी नमूद केले. भाषणानंतर त्यांची प्रेक्षकांबरोबर प्रश्नोत्तरे झाली.
श्री.बल्लाळ यांचा शाल आणि श्रीफळ देऊन यथोचित सत्कार संस्थेचे उपाध्यक्ष महादेव जाधव यांच्या हस्ते करण्यात आला. आभार प्रदर्शन संस्थेचे सभासद घन:श्याम दीक्षित यांनी केले.