ठाणे : सर्वसामान्य ठाणेकरांसाठी आरक्षित असलेल्या मैदानावर न्यू होरायझन शाळेने अनधिकृतरित्या ताबा घेतला आहे. पालिका आयुक्त डॉ. विपीन शर्मा यांनी वर्तकनगर प्रभाग समिती अंतर्गत केलेल्या पाहणी दौऱ्यात महापालिकेच्या आरक्षित भूखंडावरील अतिक्रमण हटवण्याचे आदेश दिलेले असतानाही प्रशासनाच्या बोटचेपी धोरणामुळे हे मैदान अडवल्याचा आरोप मनसेने केला आहे. सध्या सुरु असलेल्या उन्हाळी सुटीच्या अनुषंगाने हे मैदान सर्वसामान्यांसाठी खुले न केल्यास मनसे स्टाईल आंदोलनाचा दणका दिला जाईल, असा इशारा मनसेने दिला आहे.
ठाणे महानगरपालिकेच्या मंजूर विकास आराखडयानुसार वसंत लॉन्सजवळील न्यू होरायझन स्कॉलर्स स्कूलशेजारी ६६०० चौमी (१.६१ एकर) क्षेत्रफळाचे खेळाचे मैदान नियोजित आहे. या मैदानाला शाळेने संरक्षित भिंत उभारून ते बंदिस्त केले आहे. या शाळेच्या आजूबाजूला असलेल्या गांधीनगर, सुभाषनगर, माजिवडा गाव, साईनाथ नगर, चिरागनगर, हरदासनगर या मध्यमवर्गीय लोकवस्तीमधील मुलांना त्यांच्या हक्काचे खेळाचे मैदान खुले नसल्याने रस्त्यावरच खेळाचा ‘डाव’ मांडावा लागतो. मात्र मैदानच खुले नसल्याने मुलांनी खेळायचे कुठे असा प्रश्न यानिमित्ताने उपस्थित होत असल्याने महाराष्ट्र नवनिर्माण विद्यार्थी सेनेचे जिल्हाध्यक्ष संदीप पाचंगे यांनी याप्रश्नी आवाज उठवला होता. या जागेवर न्यू होरायझन स्कॉलर्स स्कूलने अतिक्रमण केलेले आहे. संबंधित मैदान सर्वसासामान्यांसाठी खुले करावे अथवा महापालिकेस सात दिवसात हस्तांतरित करावे, असे स्पष्ट आदेश पालिकेने दिल्यानंतरही शाळा व्यवस्थापनाने हे मैदान खुले केलेले नाही.
दोन दिवसांपूर्वी वर्तकनगर प्रभाग समिती अंतर्गत केलेल्या पाहणी दौऱ्यात आयुक्तांनी पालिकेच्या विविध आरक्षित भूखंडावरील अतिक्रमण हटवण्याचे स्पष्ट निर्देश दिलेले असतानाही न्यू होरायझन स्कॉलर्स स्कूलला वेगळा न्याय कशासाठी असा सवाल मनविसे जिल्हाध्यक्ष संदीप पाचंगे यांनी उपस्थित केला आहे. दरम्यान, येत्या आठ दिवसात हा भूखंड खुला न केल्यास पालिकेच्या अतिक्रमण विरोधी पथकाच्या उपायुक्तांच्या दालनाबाहेर क्रिकेटचा डाव खेळाला जाईल, असेही पाचंगे यांनी नमूद केले.
प्रशासनाकडून आयुक्तांची दिशाभूल
आयुक्तांनी एकीकडे आदेश दिले आहेत की आरक्षित भूखंडावरील अतिक्रमण तात्काळ हटवा मात्र दौरा करताना त्यांना मुद्दाम अशा ठिकाणी नेले जात नाही. न्यू होरायझन शाळा व्यवस्थापनाने सार्वजनिक वापराकरिता आरक्षित मैदानावर अनधिकृतरित्या ताबा घेतला आहे. सुट्ट्या सुरू झाल्या आहेत. त्यामुळे मुलांना त्यांच्या हक्काचे मैदान मिळालेच पाहिजे.
– संदीप पाचंगे