केवळ महोत्सव नाही तर चळवळ – आ. संजय केळकर

शिवाईनगर येथे मालवणी महोत्सवाचे उद्घाटन

ठाणे : मालवणी महोत्सव हा केवळ महोत्सव नाही तर चळवळ आहे. सांस्कृतिक मेजवानीची जोड असलेल्या या चळवळीला लोकांनीही उपस्थिती दर्शवून आर्थिक ताकद द्यावी, असे आवाहन आमदार संजय केळकर यांनी केले.

सीताराम राणे यांनी आयोजित केलेल्या कोकण ग्रामविकास मंडळाच्या २५ व्या मालवणी महोत्सवाचे उद्घाटन शुक्रवारी आ. केळकर यांच्या हस्ते झाले. यावेळी व्यासपीठावर प्रमुख पाहुणे आमदार निरंजन डावखरे, परिवहन सदस्य विकास पाटील, स्वप्नाली साळवी, मिलिंद नईबागकर, मंडळाचे सरचिटणीस विनोद देसाई, खजिनदार संदीप शिंदे, वैभव कदम आदी उपस्थित होते.

कोकण ग्रामविकास मंडळातर्फे २ ते ११ फेब्रुवारी या कालावधीत ठाणे पश्चिमेकडील पोखरण रोड नं. १, शिवाईनगर येथील उन्नती गार्डन मैदानात मालवणी महोत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे.

महोत्सवाची सुरुवात शुक्रवारी आयोजक सीताराम राणे यांनी अग्निहोत्र करून केली. मालवणी महोत्सवाचे यंदा रौप्य महोत्सवी वर्ष असल्याने सीताराम राणे यांनी महोत्सवाचा प्रारंभ ते आजवरची वाटचाल उपस्थितांसमोर उलगडली. महोत्सवाच्या उद्घाटनानंतर बोलताना आ.केळकर यांनी, मालवणी महोत्सव २५ व्या वर्षात पदार्पण केल्याबद्दल समाधान व्यक्त करून हे फक्त एक मालवणी माणुसच करू शकतो, असे सांगितले. देशात आणि परदेशात मालवणी पोहचली आहे. मालवणी महोत्सव ही एक चळवळ आहे. अशा महोत्सवातून छोट्या-मोठया उद्योगांना बळ मिळते. सांस्कृतिक मेजवानीची जोड असलेल्या या चळवळीला लोकांनीही उपस्थिती दर्शवून आर्थिक ताकद देणे गरजेचे असल्याचे मत आ. केळकर यांनी व्यक्त करत खवय्यांसाठी असे मालवणी महोत्सव म्हणजे पर्वणी असल्याचे सांगितले. याप्रसंगी आ. डावखरे यांनीही मालवणी महोत्सवाला शुभेच्छा दिल्या.