कुणाला आव्हान नव्हे, दिलासा; दरबाराबाबत नाईकांचा खुलासा!

ठाणे: ठाण्यातील जनता दरबार एकनाथ शिंदे यांना आव्हान देण्यासाठी नव्हे तर, जनतेला दिलेला शब्द पाळण्यासाठी आहे. महायुतीचे तिन्ही पक्ष जनतेला दिलासा देण्याचा प्रयत्न करीत असून त्यासाठी या जनता दरबाराचे आयोजन करण्यात आले असल्याची भूमिका वनमंत्री गणेश नाईक यांनी स्पष्ट केली.

ठाणे येथील खारकर आळी भागातील रघुवंशी हॉलमध्ये सोमवारी जनता दरबार घेण्यापूर्वी पत्रकारांशी ते बोलत होते.

मुख्यमंत्री देवेंद्र फडणविस यांच्या नेतृत्वाखाली उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, अजित पवार आणि आम्ही सर्व मंत्री एकमेकांना पूरक काम करत आहोत. महाराष्ट्र थांबणार नाही, या टॅग लाईनप्रमाणे आम्ही सर्वजण कामाला लागलो आहोत. आपली गाऱ्हाणी मांडण्यासाठी सर्वच नागरिक मंत्रालयात येऊ शकत नाहीत. मंत्र्यांना कुठे भेटायचे असा प्रश्न त्यांच्यापुढे असतो. जनतेत जाऊन त्यांचे प्रश्न सोडविण्यासाठी हा जनता दरबार घेण्यात आला असल्याचे देखील त्यांनी स्पष्ट केले.

जनता दरबारात निवेदने स्वीकारली जातील आणि १५ दिवसांत त्यावर काय कारवाई झाली, याचा आढावा पुढच्या जनता दरबारात घेतला जाणार असल्याचे देखील नाईक यांनी यावेळी सांगितले. ठाणे शहर, मीरा-भाईंदर, नवी मुंबई आणि जिल्ह्यातील प्रत्येक तालुक्यात १९९५ मध्ये मंत्री झाल्यापासून जनता दरबारचे आयोजन करण्यात येत असल्याचे त्यांनी सांगितले.

ठाणे महापालिकेवर भाजपचा झेंडा लागला पाहिजे, अशी इच्छा भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांची असल्याचे माजी खासदार संजीव नाईक यांनी सांगितल्याने राजकीय वर्तुळात खळबळ उडाली असतानाच, आता वनमंत्री गणेश नाईक यांनीही पालिका निवडणुकींबाबत भाष्य केले आहे. मला स्वबळावर निवडणुका लढायला आवडते, पण पक्षाने निर्णय घेतला तर एकत्र लढू असे नाईक यांनी म्हटले असून त्यांचे हे विधान आता शहराच चर्चेचा विषय झाला आहे.

मागिल काही दिवस जनता दरबार भरविण्यावरून शिवसेना शिंदे गट आणि भाजपामध्ये शीतयुद्ध सुरु आहे. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या बालेकिल्ल्यात जनता दरबार भरवून वनमंत्री श्री.नाईक यांनी पहिला चेंडू टाकला असून स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका जसजशा जवळ येतील तसतसे हे युद्ध आणखी भडकणार असल्याचे बोलले जात आहे. आज जनता दरबार भरवून भाजपाने तूर्त बाजी मारल्याची चर्चा ठाण्यात मात्र रंगली आहे.