६ ऑक्टोबरला भूमिपुत्र विमानतळावर धडकणार
नवी मुंबई: नवी मुंबई विमानतळाला राष्ट्रीय नेते दिवंगत दि. बा. पाटील यांचे नाव नाही तर दिले तर विमानतळाचे उद्घाटन होऊ देणार नाही. येत्या ६ ऑक्टोबरला समस्त भूमिपुत्रांच्या वतीने एक धडक मोर्चा काढण्यात येणार आहे, अशी स्पष्ट भूमिका खासदार सुरेश म्हात्रे यांनी मांडली आहे.
नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाला दि. बा. पाटील यांचे नाव देण्यात उशीर केला जात असून केंद्राकडून अजून अंतीम अधिसूचना काढली जात नाही. त्यामुळे येथील भूमिपुत्रांनी आंदोलनाचा पावित्रा घेतला असून या आंदोलनाची रूपरेषा ठरविण्यासाठी खासदार सुरेश (बाळ्यामामा) म्हात्रे ह्यांनी रविवारी कोपरखैरणे येथील शेतकरी समाज मंदिरमध्ये बैठकीचे आयोजन केले होते. त्यावेळी सुरेश म्हात्रे यांनी आपली भूमिका स्पष्ट केली.
नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाला दिबा पाटील यांचे नाव देण्यात यावे अशी समस्त भूमिपुत्रांची मागणी असून तसा ठराव देखील राज्य सरकारने मंजुर करून केंद्र सरकारकडे पाठवला आहे. तर विमानतळाचे उद्घाटन आता येत्या ८ किंवा ९ ऑक्टोबरला होणार असून विमानतळाला दिबा पाटील यांचे नाव असेल असे सुतोवाच राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केले आहे. मात्र हा प्रस्ताव केंद्राकडे असून त्यास तीन वर्षे होत आली तरी अद्याप त्यावर निर्णय घेतला जात नाही. आणि असे असताना उद्घाटनाचा घाट घातला जात आहे. त्यामुळे केंद्राने जर उद्घाटनाआधी विमानतळाला दीबा पाटील यांचे नाव जाहीर केले तर आम्ही त्यांचे स्वागत करू, सत्कार करू.आणि नाव जाहीर न करताच उद्घाटन केले तर संघर्ष अटळ असल्याचा इशारा यावेळी देण्यात आला.