उल्हास, काळू, भातसा नदीच्या पाण्याच्या पातळीत वाढ

नदी किनारी असलेल्या गावांना सतर्कतेचा इशारा

कल्याण : कल्याण-डोंबिवली शहरासह कल्याण तालुक्यातील ग्रामीण भागातील गावासह उल्हासनदी खोऱ्यातील आजूबाजूच्या परिसरात गेल्या २४ तासांपासून धुवाधार पाऊस कोसळत असल्याने काही सखल भागात पाणी साचले. तर उल्हास नदी व काळू नदीची पातळी वाढल्याने नदी दुथडी भरून वाहत असल्याने प्रशासनाने नदी किनारी असलेल्या गावांना सतर्कतेचा इशारा दिला होता.

उल्हास नदी मोहीली परिसरात दुथडी भरून वाहत असून मोहीली आणि म्हारळ परिसराला जोडणारा पूल पाण्याखाली जाण्याची शक्यता निर्माण झाली आहे. उल्हास नदीच्या पाण्याची पातळी वाढली आहे. नदी किनारी राहणाऱ्या नागरीकांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला असल्याची माहिती कल्याण तहसीलदार सचिन शेजाळ यांनी देत उल्हासनदी पाणी पातळी वाढ पाहता मोहीली म्हारळ जोडणाऱ्या पूलावरील वाहतूक बंद करणार असल्याचे सांगितले. तर रायते पूल देखील पाण्याखाली गेल्याने संध्याकाळी बंद करण्यात आला. तसेच भातसा नदी खडवली पूल पाण्याखाली गेला.

काळूनदीवरील रुंदे पूल पाण्याखाली गेल्याने जनजीवन विस्कळीत झाले. काळू, भातसा, उल्हास नद्यांनी धोक्याची पातळी ओलांडल्याने नदी किनारी राहणाऱ्या लोकांना सावधानतेचा इशारा देत प्रशासन लक्ष ठेवून होते.