ठाणे: बाळकुम येथील यशवंतराव चव्हाण यांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून अभिवादन केल्यानंतर राष्ट्रवादीच्या खासदार सुप्रिया सुळे आणि राज्याचे गृह निर्माणमंत्री डॉ.जितेंद्र आव्हाड यांनी जवळील शिवसेना शाखेत जाऊन पाहुणचार स्वीकारला. आगामी महापालिका निवडणुकीत काँग्रेस स्वबळावर लढण्यावर ठाम असली तरी या घटनेने मात्र शिवसेना आणि राष्ट्रवादीचे सूर आघाडीसाठी जुळल्याची चर्चा सुरू झाली होती.
यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठानच्या कार्यक्रमानिमित्त खा. सुप्रियाताई सुळे या ठाण्यात आल्या होत्या. या प्रसंगी त्यांनी बाळकूम येथील यशवंतराव चव्हाण यांच्या पुतळ्यास अभिवादन केले. यावेळी त्यांच्यासोबत गृहनिर्माण तथा अल्पसंख्यांक मंत्री डॉ. जितेंद्र आव्हाड, माजी खा. आनंद परांजपे, माजी महापौर मनोहर साळवी, माजी विरोधी पक्षनेते हणमंत जगदाळे, मिलींद पाटील, प्रमिला केणी, राष्ट्रवादीच्या शहर महिलाध्यक्ष सुजाता घाग आदी राष्ट्रवादीचे पदाधिकारी आणि अनेक कार्यकर्ते उपस्थित होते.
सुप्रिया सुळे म्हणाल्या की, माझे सर्व आयुष्य हे यशवंतराव चव्हाण यांना आदर्श मानूनच जगत आलेली आहे. त्यामुळे त्यांना अभिवादन करण्यासाठी दिवस, वार याची गरज मला भासत नाही. यशवंतराव चव्हाण यांचा महाराष्ट्राला सार्थ अभिमान आहे. महाराष्ट्राचा मंगल कलश त्यांनीच आणला. किंबहुना, त्यांच्यामुळेच महाराष्ट्राकडे प्रगत आणि पुरोगामी राज्य म्हणून पाहिले जात आहे. नवीन तंत्रज्ञान आणि नवे विचार हे महाराष्ट्रातच येतात अन् त्यानंतर ते देशभर पोहचते. आज देशामध्ये स्टार्टअपची जी चर्चा सुरु आहे. त्याकडे पाहता, केंद्र सरकारचाच अहवाल सांगत आहे की, देशातील सर्वात जास्त स्टार्टअप कुठे असतील तर ते केवळ आपल्या महाराष्ट्रातच आहेत.
बाळकूम येथे ज्या ठिकाणी यशवंतराव चव्हाण यांचा पुतळा आहे; त्याच ठिकाणी शिवसेनेची शाखा आहे. सुप्रिया सुळे यांचे आगमन झाल्यानंतर शिवसेनेचे पदाधिकारी सुनील पाटील, वासुदेव भोईर आणि संतोष भोईर यांनी सुळे यांना चक्क शिवसेना शाखेत येण्याचे निमंत्रण दिले. सुळे यांनीदेखील खुल्या दिलाने त्यांचे निमंत्रण स्वीकारले. शिवसेना शाखेत प्रवेश केल्यानंतर
सुप्रिया सुळे यांनी छत्रपती शिवाजी महाराज, शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे, माँसाहेब मीनाताई ठाकरे आणि धर्मवीर आनंद दिघे यांच्या प्रतिमांना पुष्पहार अर्पण करीत अभिवादन केले. या प्रसंगी शिवसेना पदाधिकाऱ्यांकडून सुप्रिया सुळे आणि ना. डाॅ.जितेंद्र आव्हाड यांचे स्वागत करण्यात आले. यावेळी स्थानिक शिवसेना नगरसेवक देवराम भोईर आणि संजय भोईर हेदेखील उपस्थित होते.
सुप्रिया सुळे शाखेतून बाहेर आल्यानंतर पत्रकारांनी या संदर्भात विचारले असता, त्या म्हणाल्या, आम्ही तुम्हाला उद्याचे संपादकीय काय आहे, हे विचारतो का? आमचीही काही स्ट्रॅटेजी असेल. पालिका निवडणुकीत महाविकास आघाडी करण्याचा निर्णय आम्ही त्यावेळीच जाहीर करू; त्यासाठी आताच चर्चा कशाला? असा सवाल करीत महाविकास आघाडीबाबत पहिले पाऊल टाकले.