समृध्दी महामार्गाच्या कोनशिलेचे प्रधानमंत्र्यांच्या हस्ते उदघाटन
नागपूर : हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे महाराष्ट्र समृध्दी महामार्गाच्या कोनशिलेचे अनावरण प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या हस्ते झाले. महामार्गाच्या नागपूर येथील झिरो पाँईंटपासून दहा किलोमीटर अंतरावर असलेल्या टोल प्लाझा येथे अनावरणाचा हा कार्यक्रम झाला. राज्यपाल भगत सिंह कोश्यारी, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, केंद्रीय महामार्ग मंत्री नितीन गडकरी, केंद्रीय रेल्वे राज्यमंत्री रावसाहेब दानवे, केंद्रीय आरोग्य राज्यमंत्री डॉ. भारती पवार, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, आमदार चंद्रशेखर बावनकुळे आदी उपस्थित होते.
कोनशिलेचे अनावरण केल्यानंतर प्रधानमंत्र्यांनी महामार्गाची पाहणी केली. तत्पूर्वी श्री. मोदी यांनी समृद्धी महामार्गावर झिरो पाँईंट ते टोल प्लाझा असा 10 किलोमीटरचा प्रवास केला. त्यांच्या समवेत मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री व अन्य मान्यवर होते. कोनशिला अनावरणप्रसंगी प्रधानमंत्र्यांच्या स्वागतासाठी ढोलताशा पथक ठेवण्यात आले होते. प्रधानमंत्र्यांनी स्वतः ढोल वाद्य वाजवत अनोखा आनंद घेतला. या पथकातील कलावंतांशी संवाद साधला. कार्यक्रमस्थळी नागरिकांची मोठ्या संख्येने उपस्थिती होती. अनावरण संपवून निघतांना प्रधानमंत्र्यांनी नागरिकांची गर्दी असलेल्या ठिकाणी वाहन हळू करत हात उंचावून त्यांचे अभिवादन स्विकारले.
मुंबई ते नागपूर 812 किलोमीटरचं अंतर कापण्यासाठी 14 तास लागतात. समृद्धी महामार्गामुळे हे अंतर पार करण्यासाठी 8 तास लागतील. 701 किलोमीटर या महामार्गाची लांबी आहे. औरंगाबाद हे मध्यावर आहे. त्यामुळे औरंगाबाद ते नागपूर जाण्यासाठी चार तास आणि औरंगाबाद ते मुंबई जाण्यासाठी चार तास लागतील.
हा मार्ग राज्यातल्या 10 जिल्ह्यांमधून जाणार आहे. नागपूर, वर्धा अमरावती, वाशिम, बुलढाणा, जालना, औरंगाबाद, अहमदनगर, नाशिक, ठाणे या जिल्ह्यांमधून जाणारा हा महामार्ग आहे.
ठाणे ते नागपूर जोडणारा महामार्ग
हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे महाराष्ट्र समृद्धी महामार्ग हा नागपूर जिल्ह्यातील शिवमडका या गावापासून ते ठाणे जिल्ह्यातील आमनेगाव यांना जोडणारा महामार्ग असून यामुळे राज्यातील रस्त्याचे जाळे एकमेकांशी जोडून दळणवळण गतिमान होणार आहे. महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळाच्या हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे महाराष्ट्र समृद्धी महामार्ग प्रकल्पामुळे राष्ट्रीय दळणवळण आणि मालवाहतूक सुविधेत सहा टक्के योगदान मिळण्याची अपेक्षा आहे. समृद्धी महामार्ग महाराष्ट्राच्या विकासाला गती देणारा हा प्रकल्प ठरणार आहे.