खगोलशास्त्रातील एक तारा निखळला
पुणे: ज्येष्ठ खगोल शास्त्रज्ञ जयंत नारळीकर यांचे पुण्यातील राहत्या घरी निधन झाले आहे. ते 86 वर्षांचे होते. पहाटे झोपेतच त्यांची प्राणज्योत मालवली.
आंतरराष्ट्रीय स्तरावर ज्यांचा खगोल शास्त्रातील अधिकार मान्य झाला होता असे जयंत नारळीकर तेवढ्याच रसाळ भाषेत मराठी विज्ञानकथा लिहीण्यासाठी देखील लोकप्रिय होते.
केंब्रीज विद्यापीठातून शिक्षण घेतल्यावर ते भारतात परतले. आधी टाटा मुलभूत संशोधन संस्थेत त्यांनी काम केले. त्यानंतर आयुका संस्थेच्या उभारणीत त्यांचा सिंहाचा वाटा राहिला आहे. 2021मध्ये नाशिकमध्ये झालेल्या अखिल भारतीय साहित्य संमेलनाचे ते अध्यक्ष होते.
जयंत नारळीकर यांचा जन्म कोल्हापूरमध्ये झाला होता. त्यांचे वडील बनारस हिंदू विद्यापीठात शास्त्रज्ञ होते. जयंत नारळीकर यांचे शिक्षण बनारस हिंदू विद्यापीठात झाले. पुढील शिक्षणासाठी ते केंब्रिजला गेले. त्याकाळी जयंत नारळीकर यांनी फ्रेड हॉईल यांच्यासोबत काम केले होते. फ्रेड हॉईल हे जयंत नारळीकर यांचे गुरु होते. जगभरातील आघाडीच्या खगोलशास्त्रज्ञांमध्ये फ्रेड हॉईल यांचा समावेश व्हायचा. त्याकाळात हॉईल-नारळीकर ही थिअरी त्याकाळी प्रसिद्ध झाली होती. जगाची निर्मिती स्फोटातून झाली, या थिअरीचे दोघेही टीकाकार होते. जयंत नारळीकर यांना 1972 साली तत्कालीन पंतप्रधान इंदिरा गांधी यांनी बोलावून घेतले. त्यानंतर जयंत नारळीकर यांनी टीआयएफआरमध्ये दाखल झाले. भारताचे आजचे खगोलशास्त्राचे जे संशोधन आणि प्रगती आहे त्यामध्ये जयंत नारळीकर यांनी पाया रचला होता. ते आधुनिक खगोलशास्त्राचे उद्गाते होते. त्यांच्या जाण्याने हे पर्व संपले आहे, अशी प्रतिक्रिया खगोलशास्त्राचे अभ्यासक मयुरेश प्रभुणे यांनी व्यक्त केली.
डॉ. नारळीकर यांचा परिचय
डॉ. नारळीकर यांचा जन्म कोल्हापूर येथे 19 जुलै 1938 रोजी झाला. त्यांचे वडील रँग्लर विष्णू वासुदेव नारळीकर हे प्रसिद्ध गणिततज्ञ आणि वाराणसीच्या बनारस हिंदू विद्यापीठाच्या गणित शाखेचे प्रमुख होते तर आई सुमती विष्णू नारळीकर या संस्कृत विदुषी होत्या. शालेय शिक्षण वाराणसी येथे झाल्यानंतर विज्ञान शाखेची पदवी त्यांनी प्राप्त केली. उच्च शिक्षणासाठी ब्रिटनमधील केंब्रिज गाठल्यानंतर त्यांनी बीए, एमए आणि पीएचडी पदवी मिळवली. याशिवाय रँग्लर ही पदवी, खगोलशास्त्राचे टायसन मेडल, स्मिथ पुरस्कार व इतर अनेक बक्षिसे त्यांनी पटकावली.
डॉ. जयंत नारळीकर यांची साहित्य संपदा
अंतराळातील भस्मासूर, अंतराळातील स्फोट, अभयारण्य, चला जाऊ अवकाश सफरीला, टाइम मशीनची किमया, प्रेषित, यक्षांची देणगी, याला जीवन ऐसे नाव, वामन परत न आला, व्हायरस.
इतर विज्ञानविषयक पुस्तके
अंतराळ आणि विज्ञान, आकाशाशी जडले नाते, गणितातील गमतीजमती, नभात हसरे तारे (सहलेखक : डॉ. अजित केंभावी आणि डॉ. मंगला नारळीकर), नव्या सहस्रकाचे नवे विज्ञान, विश्वाची रचना, विज्ञान आणि वैज्ञानिक, विज्ञानगंगेची अवखळ वळणे, विज्ञानाची गरुडझेप, विज्ञानाचे रचयिते, सूर्याचा प्रकोप, चार नगरांतले माझे विश्व (आत्मचरित्र).
डॉ. जयंत नारळीकर यांना मिळालेले गौरव
2004 – पद्मविभूषण
2010 – महाराष्ट्र भूषण
2014- साहित्य अकादमी.