राज्य शासनाकडून महापालिकेला ९४३ कोटी
भाईंदर : आगामी मीरा-भाईंदर महानगरपालिकेच्या सार्वत्रिक निवडणूकीच्या पार्श्वभूमीवर राज्य शासनाने या शहराच्या विकासासाठी आता 943 कोटी रूपये मंजूर केले आहेत.
कोरोनामुळे आर्थिक डबघाईला आलेल्या या महानगरपालिकेला निवडणुकीच्या तोंडावर गर्भश्रीमंत होण्याचा बहुमान शिवसेनेच्या माध्यमातून मिळाला असल्याची जोरदार चर्चा राजकीय वर्तुळात होत आहे.
मीरा-भाईंदर महानगरपालिकेची आगामी सार्वत्रिक निवडणूक ऑगस्ट महिन्याअखेर होत आहे. या महानगरपालिकेत भाजपाची सध्या सत्ता आहे. मात्र या निवडणुकीला सामोरे जाण्याकरीता राज्यातील महाविकास आघाडी सरकारने या महानगरपालिकेकरीता अर्थसंकल्पात 943 कोटी रूपयांची तरतूद केली असल्याची माहिती शिवसेना सहयोगी आमदार गिता जैन यांनी दिली आहे. या शहराला भेडसवणारी भीषण पाणीटंचाई लक्षता घेत शहरातील अंतर्गत जलवाहिन्या बदलण्याकरीता 443 कोटी रूपये, रोरो जलवाहतूक मार्ग निर्मितीकरीता 330 कोटी रूपये, जंजिरे धारावी किल्ल्याच्या विकासासाठी 10 कोटी रूपये, पर्यटन व धार्मिक स्थळ विकासासाठी पाच कोटी, रस्ते निर्मितीसाठी पाच कोटी, दलितवस्ती विकासासाठी 21 कोटी, हायमास्ट निर्मितीसाठी अडीच कोटी, उद्यान निर्मितीसाठी दोन कोटी, मुलभूत सोईसुविधांसाठी काही निधी मंजूर करण्यात आला असल्याचे गिता जैन यांनी सांगितले.