खर्डी एमआयडीसीचे भूसंपादन झाले; मोबदला मात्र रखडला

मुंबईतील शेतकरी तुपाशी, स्थानिक शेतकरी मात्र उपाशी

शहापूर: महाराष्ट्र राज्य औद्योगिक विकास मंडळाची वसाहत शहापूर तालुक्यातील खर्डी येथे उभी करण्यासाठी स्थानिक शेतकऱ्यांच्या जमिनी प्रशासनाने संपादित केल्या, पण शेतकऱ्यांना प्रशासनाने मोबदला देण्यास टाळाटाळ सुरु केल्याने शेतकरी चिंताग्रस्त झाले आहेत.

जागेचा मोबदला मिळावा यासाठी शेतकऱ्यांनी वारंवार अधिकाऱ्यांच्या गाठीभेटी घेतल्या. मात्र प्रशासनाने त्यांना दाद दिली नाही. या एमआयडीसी अधिकाऱ्यांच्या मनमानीमुळे स्थानिक शेतकरी प्रचंड त्रस्त आहेत. एमआयडीसीच्या मनमानीविरोधात स्थानिक प्रकल्पग्रस्त शेतकऱ्यांनी आझाद मैदानात उपोषण करण्याचा इशारा दिल्यावर ठाणे येथील अधिकाऱ्यांनी तातडीने पावले उचलून शेतकऱ्यांना तत्काळ मोबदला देण्याचे मान्य केले होते. याबाबतचे लेखी पत्र शेतकऱ्यांना दिले. परंतु आजपर्यंत स्थानिक शेतकऱ्यांना आर्थिक मोबदला दिला नाही. उलटपक्षी मुंबई येथील उद्योजक शेतकऱ्यांना मात्र कोणतेही निकष न पाहता प्रथम आर्थिक मोबदला देण्यात आल्याचा आरोप शेतकरी करीत आहेत. विशेष म्हणजे स्थानिक शेतकऱ्यांच्या सातबारा उताऱ्यावर एमआयडीसीचा उल्लेख असल्याने सेवा सहकारी सोसायटीमधून कर्ज मिळत नाही. तसेच सदरची जागा विक्रीही करू शकत नाही आणि एमआयडीसी सुद्धा मोबदला देण्याबाबत टाळाटाळ करत असल्याचे शेतकऱ्यांचे म्हणणे आहे.

दरम्यान मुंबईतील उद्योजक शेतकऱ्यांना मात्र मोबदला देतांना पश्चिमघाटचा निकष लावला जात नाही, त्यांच्या जागेत टेकड्या असूनही त्यांना मोबदला दिला गेला. परंतु स्थानिक शेतकऱ्यांना मोबदला देतांना पश्चिम घाटचा निकष लावून अन्याय केला जात आहे.

मुंबईस्थित उद्योजक शेतकऱ्याने खर्डी एमआयडीसी भूसंपादन नोटीस जाहीर झाल्यावर खरेदीखत केले असून याबाबत ठाणे जिल्हाधिकाऱ्यांनी खर्डी एमआयडीसी भूसंपादन नोटीस जाहीर झाल्यानंतर कोणतेही जमीन खरेदी-विक्री व्यवहार करू नये असे प्रशासनाला कळवले होते. असे असतांना देखील सदर ठिकाणी मोठ्या प्रमाणावर खरेदी-विक्री झाली आहे. ते सर्व व्यवहार रद्द करण्याची मागणी स्थानिक शेतकऱ्यांनी केली आहे. तथापि शेतकऱ्यांचा प्रशासनाबाबत असंतोष वाढत असून मुंबईतील शेतकरी तुपाशी व स्थानिक 12 शेतकरी मात्र उपाशी अशी अवस्था स्थानिक प्रकल्पग्रस्त शेतकऱ्यांची झाली आहे.

खर्डी एमआयडीसीसाठी शासनाने आमच्या जमिनी संपादित केल्या. आम्ही शेतकरी शासनाकडे गेलो नव्हतो, मग मोबदला देतांना मुंबई येथील उद्योजक शेतकऱ्यांना आर्थिक मोबदला दिला गेला आणि आमच्यावरच अन्याय का, असा प्रश्न स्थानिक शेतकरी गणेश कथोरे यांनी उपस्थित केला आहे.

खर्डी एमआयडीसीला मंजुरी देतांना हाय पॉवर कमिटीने सगळे निकष तपासून दिले आहेत. यातील खर्डी गावातील 90 टक्के शेतक-यांना मोबदला दिला गेला आणि आता उरलेल्या 10 टक्के शेतकऱ्यांचा मोबदला देतांना ही जमीन पश्चिम घाट क्षेत्रात येत असल्याने अडवला आहे. मुंबईतील उद्योजक शेतकऱ्यांना टेकड्यांचा देखील पूर्ण मोबदला दिला आहे, मग स्थानिक शेतकऱ्यांची का अडवणूक केली जात आहे, असा प्रश्न अनिल घोडविंदे यांनी विचारला आहे.