मनसे आणि शरद पवार गटाचा आक्रमक पवित्रा
ठाणे: २०१७ साली बंद करण्यात आलेला मुंबई-नाशिक महामार्गावरील खारीगाव टोलनाका आता नव्या रस्ते प्रकल्पामुळे पुन्हा उभारला जात आहे. समृद्धी महामार्गाशी जोडणाऱ्या आमने ते ठाणे या दहा पदरी मार्गिकेच्या कामामुळे हा निर्णय घेण्यात आला आहे. यामुळे मुंबईकडे जाणारा प्रवास वेगवान होणार असला तरी ठाणे, कल्याण, भिवंडी, नवी मुंबई आणि मुंबईकडे येणाऱ्या वाहनचालकांना पुन्हा टोलचा आर्थिक भार सहन करावा लागणार आहे. मात्र या टोल विरोधात मनसे आणि राष्ट्रवादी शरद पवार गटाने आक्रमक पवित्रा घेतला आहे.
मुंबई-नाशिक महामार्गावरील माजिवडा ते वडपे या 23 किमी लांबीच्या प्रकल्पाचे काम 90 टक्के पूर्ण झाले आहे. येत्या काही महिन्यात या मार्गिकेच्या निर्माणाचे काम पूर्ण होण्याची शक्यता आहे. त्यामुळे मुंबई-नाशिक महामार्ग आणि समृद्धी महामार्गावरून मुंबईच्या दिशेने होणारा प्रवास वेगवान होणार आहे. मात्र असे असले तरी वाहनचालकांना टोलचा भुर्दंड सहन करावा लागणार आहे.
या टोलनाक्यामुळे दररोज हजारो वाहनचालकांना अतिरिक्त खर्चाचा सामना करावा लागणार आहे. उरण जेएनपीए आणि गुजरातहून येणारी अवजड वाहने तसेच कल्याण-भिवंडीतील स्थानिक वाहतूकही या मार्गाचा मोठ्या प्रमाणावर वापर करते. त्यामुळे टोलचा परिणाम मोठ्या प्रमाणावर जाणवणार आहे.
या निर्णयाला मनसेने विरोध केला आहे. काहीही झाले तरी टोलनाका उभारू देणार नाही असा पवित्रा मनसेने घेतला आहे. टोलच्या नावाखाली सरकार सामन्यांची लूट करत आहे अशी टीका मनसे नेते अविनाश जाधव यांनी केली. आधीच मुंबई-नाशिक महामार्गावरती तीन टोल नाके आहेत. चौथा खारीगाव टोल होऊन देणार नाही, असा इशारा जाधव यांनी दिला आहे. त्यामुळे पुन्हा टोल नाका संघर्ष होण्याची शक्यता आहे.
खारीगाव किंवा मुंब्रा येथील नागरिकांना घोडबंदर गाठायचे असेल तर महामार्ग उत्तम पर्याय आहे. मात्र, ठाणे शहरात यायचे असताना किंवा पुन्हा परतीचा प्रवास करताना दोन वेळा टोल भरावा लागणार आहे. किंवा टोल टाळण्यासाठी द्राविडी प्राणायाम करीत कळवा, कोर्टनाका, जांभळी नाका, खोपट जंक्शन, माजीवडा येथील वाहतूक कोंडीत अडकावे लागणार आहे. त्यामुळे पर्यायी रस्ता तयार करून द्यावा. ठाणेकरांना टोलमुक्ती द्यावी; खारीगाव टोल नाक्यावर जर ठाणेकरांना टोलमुक्ती देण्यात आली नाही; तर, आम्ही हा टोल नाका बंद पाडू, असा इशारा राष्ट्रवादी शरद पवार गटाचे ठाणे शहर अध्यक्ष मनोज प्रधान यांनी दिला आहे.