पर्यावरणासमोर विचित्र आव्हान
ठाणे : खारफुटीची लक्षणीय वाढ आणि खाडी क्षेत्रात होऊ लागलेली घट यामुळे नजीकच्या काळात ठाणे-मुंबईतील पर्यावरणाला मोठा धोका होण्याची शक्यता तज्ञांनी व्यक्त केली आहे.
ठाणे-मुंबईतील शहरांना लाभलेली किनारपट्टी आणि खाडीचे सानिध्य हा नेहमीच पर्यावरण तज्ञांसाठी अभ्यासाचा विषय ठरला आहे. मुंबई क्लायमेट ॲक्शन प्लॅन अंतर्गत झालेल्या पाहणीत एका अभ्यास गटाने काही धोक्याचे इशारे दिले आहेत. 1972 ते 2016 या काळात खारफुटीचे प्रमाण वाढले आहे. 1990 ते 2017 या दरम्यान खारफुटीचे शेत्रफळ 75. 36 चौरस कि.मी. ने वाढले आहे. परंतु त्याचबरोबर खाडी बुजवून बांधकामे आणि रस्ते यांचे बांधकाम झाले आणि हे प्रमाण दुप्पट होत या बांधकामाचे क्षेत्रफळ 145.56 चौ. किमी इतके झाले. क्षेत्रफळाचा विचार करता खारफुटीच्या 9.68 चौ. की. मी. पेक्षा बांधकामाचे प्रमाण 41.73 चौ. कि.मी. अर्थात चौपट होते.
साधारणतः खाडीच्या संवर्धनाचा विषय 2005 पासून चर्चेत आला. मुंबईत झालेल्या महापुरामुळे तर हाहाकार उडाला होता. 1990मध्ये खारफुटीची मोठ्या प्रमाणात कत्तल झाल्यावर प्रयत्नपूर्वक ते रोखण्याचा आणि खारफुटी लागवडीत वाढ करण्याचा कार्यक्रम पर्यावरणवाद्यांच्या पुढाकाराने झाला. परंतुं तरीही बुलेट ट्रेनसारख्या महत्वाकांक्षी प्रकल्पांसाठी ही कत्तल सुरूच राहणार आहे. खाडीचे क्षेत्रफळ 12 टक्क्यांनी घटले आहे. खारफुटीमुळे 30 टक्के खाडी व्यापली आहे. खाडीतील गाळ हा सांडपाण्यावर तसेच मलावर प्रक्रिया न करता सोडल्यामुळे वाढत चालला आहे. त्यामुळेही खारफुटीची वाढ झपाट्याने होऊ लागली आहे. यामुळे अनेक ठिकाणी खाडी चिंचोळी झाली आहे.
सांडपाण्यावर प्रक्रिया न करता तसेच सोडून दिल्यामुळे माशांचे प्रमाण घटले आहे. जलचरांवर होणारे विपरीत परिणाम यामुळे पर्यावरण धोक्यात येणार आहे आणि त्याचे दूरगामी परिणाम मुंबईसह ठाणे जिल्ह्याला भोगावे लागणार आहेत.