‘कौन बनेगा करोडपती’ करण्यापूर्वी अमिताभ बच्चन यांनी ठेवली होती एक अट

छोट्या पडद्यावरील अतिशय लोकप्रिय शो म्हणजे कौन बनेगा करोडपती. माहितीचा स्त्रोत म्हणून पाहिल्या जाणाऱ्या या शोच्या १४ व्या पर्वाला लवकरच सुरुवात होणार आहे. बॉलिवूड अभिनेते अमिताभ बच्चन यंदाच्या पर्वाचे सूत्रसंचालन करणार आहेत. ‘कौन बनेगा करोडपती’ या शोला बिग बी अमिताभ बच्चन यांच्यामुळे विशेष महत्व प्राप्त झालं आहे. या शोमध्ये आलेल्या प्रत्येक स्पर्धकासोबत बिग बी मोठ्या विनम्रतेने आणि दिलखुलास अंदाजात संवाद साधत असतात. नुकतंच या कार्यक्रमाचे दिग्दर्शक अरुण शेषकुमार यांनी या कार्यक्रमाबद्दल अनेक खुलासे केले आहेत. यात त्यांनी कार्यक्रमातील बदल आणि अमिताभ बच्चन यांच्यासोबत काम करतानाचा अनुभवही शेअर केला आहे.

‘कौन बनेगा करोडपती १४’ चे दिग्दर्शक अरुण शेषकुमार यांनी IANS या वृत्तसंस्थेशी संवाद साधला. त्यावेळी ते म्हणाले, “केबीसी हा एक फार चांगला कार्यक्रम आहे. या कार्यक्रमाद्वारे तुमच्या ज्ञानात भर पडते. यासाठी तुम्हाला नृत्य, गाणे किंवा इतर काहीही येणं आवश्यक नाही. तुम्ही जे वाचलं आहे, लिहिलं आहे त्याच्या आधारे तुम्ही या कार्यक्रमात सहभागी होऊ शकता.” यावेळी त्यांना अमिताभ बच्चन यांच्याबद्दल विचारले असता ते म्हणाले, “अमिताभ बच्चन हे या कार्यक्रमाचे प्रमुख व्यक्ती आहेत. आम्ही त्यांना शोचा कंडक्टर असे देखील म्हणतो. ते हा संपूर्ण शो चालवतात. विशेष म्हणजे प्रत्येक परिस्थितीशी ते फार जुळवून घेतात. तसेच स्पर्धकांवरील तणावही दूर करण्याचा प्रयत्न करतात.”

जेव्हा आम्ही अमिताभ बच्चन यांना कौन बनेगा करोडपती हा कार्यक्रम करण्याबद्दल विचारले होते तेव्हा त्यांनी आमच्या समोर काही अटी ठेवल्या होत्या. त्यावेळी ते म्हणाले होते की, “मी फक्त एका अटीवर या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन करेन आणि ती अट म्हणजे हा कार्यक्रम प्रोफेशनल पद्धतीने चालवण्यात यावा. त्यांच्या या अटीमुळे मला प्रचंड दबावाखाली काम करावे लागते. केबीसीच्या सेटवरील प्रत्येक गोष्ट नीट आहे की नाही, सर्व गोष्टी जागच्या जागी आहेत की नाही याचीही योग्य ती काळजी घेतली जाते. तसेच ते आल्यावर सेटवर शांतता पाहायला मिळते.”

दरम्यान केबीसीचे १४ वे पर्व लवकरच सुरु होणार आहे. येत्या ऑगस्टच्या पहिल्या आठवड्यापासून हा कार्यक्रम प्रदर्शित होणार असल्याचे बोललं जात आहे. या कार्यक्रमाचे अनेक प्रोमो सध्या व्हायरल झाले आहेत. मात्र अद्याप हा कार्यक्रम कधी सुरु होणार याची नेमकी तारीख समोर आलेली नाही.