एकत्रित आराखड्यासाठी ठामपाचा पुढाकार
ठाणे : ठाणे पश्चिम रेल्वे स्थानकाचा विकास ठाणे महापालिका, राज्य परिवहन आणि रेल्वे प्रशासन यांनी एकत्रित केल्यास प्रकल्प फायदेशीर आणि लोकाभिमुख होणार आहे. त्यानुसार एकत्रित आराखडा तयार करण्यासाठी ठाणे महापालिकेनेच पुढाकार घेतला आहे.
ठाण्याचे पश्चिम रेल्वे स्थानक परिसरात प्रवाशांच्या सोयीसाठी बहुमजली वाहनतळे, अंतर्गत मेट्रो रेल्वेचे स्थानक असे प्रकल्प महापालिका, रेल्वे आणि राज्य परिवहन महामंडळामार्फत राबविण्यात येणार असून या कामांसाठी तिन्ही विभागाकडून स्वतंत्र आराखड्याद्वारे कामे केली जाणार असल्याने हे प्रकल्प भविष्यात प्रवाशांसाठी गैरसोयीची ठरण्याची भीती व्यक्त होत आहे. या पार्श्वभूमीवर तिन्ही यंत्रणांना एकत्रित आणून एकाच आराखड्याच्या माध्यमातून प्रवाशांना सोयीस्कर ठरेल अशा पद्धतीने प्रकल्पांची उभारणी करण्यासाठी ठाणे महापालिका प्रशासनाने पुढाकार घेतला आहे.
ठाणे पश्चिम रेल्वे स्थानकातून दररोज सहा लाखाहून अधिक प्रवासी प्रवास करतात. या स्थानकावर प्रवाशांचा भार वाढलेला असून तो कमी करण्यासाठी ठाणे ते मुलुूंडदरम्यान नवीन स्थानक प्रस्तावित करण्यात आले आहे. ठाणे ते कासारवडवलीदरम्यान मेट्रो प्रकल्पाच्या उभारणीचे काम सुरु आहे. याशिवाय, ठाणेकरांना अंतर्गत सार्वजनिक वाहतुकीचा नवा पर्याय उपलब्ध व्हावा यासाठी अंतर्गत मेट्रो प्रकल्प प्रस्तावित असून या प्रकल्पाचा आराखडा महामेट्रोने तयार केलेला आहे. नवीन स्थानक, घोडबंदर आणि ठाणे स्थानक अशी अंतर्गत मेट्रोची वर्तुळाकार मार्गिका असणार आहे. अंतर्गत मेट्रोची एकूण २२ स्थानके असणार असून त्यात ठाणे स्थानकाचाही समावेश आहे.
या प्रकल्पाबरोबरच राज्य परिवहनच्या जागेवर आगार आणि बहुमजली वाहनतळ उभारणीचा प्रस्ताव पालिकेने परिवहन प्रशासनाला दिला होता. या प्रस्तावाबाबत परिवहन प्रशासनाकडून सकात्मक प्रतिसाद मिळाल्याने पालिका आता त्यांना सविस्तर प्रकल्प आराखडा सादर करणार आहे. याशिवाय, स्थानक परिसरातील रेल्वेच्या जागेवर रेल्वे विभागाकडून वाहनतळाची उभारणी करण्यात येणार आहे. या तिन्ही प्रकल्पांमुळे ठाणेकरांना स्थानकाजवळच वाहनतळाची सुविधा मिळणार असून त्याचबरोबर अंतर्गत वाहतूकीसाठी मेट्रोचा पर्याय उपलब्ध होणार आहेत. परंतु महापालिका, रेल्वे आणि राज्य परिवहन महामंडळ या तिन्ही विभागाकडून स्वतंत्र आराखड्याद्वारे कामे केली जाणार असल्याने हे तिन्ही प्रकल्प भविष्यात प्रवाशांसाठी गैरसोयीचे ठरण्याची भीती व्यक्त होत आहे. नेमकी हीच बाब लक्षात घेऊन आयुक्त अभिजीत बांगर यांनी संबंधित विभागाच्या अधिकाऱ्यांसोबत बैठका घेण्यास सुरुवात केली असून त्यात ते तिन्ही विभागांनी एकत्रित येऊन ही कामे करावीत, असा आग्रह धरत आहेत, अशी माहिती पालिका सुत्रांनी दिली.