शहापुरात पावसाचा हाहाकार

* नदी-नाले तुडुंब; जनजीवन विस्कळीत
* गावांचा तालुक्याशी संपर्क तुटला

शहापूर: शनिवारपासून सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे गंभीर परिस्थिती निर्माण झाली आहे. अतिवृष्टीमुळे शहापूर तालुक्यात मोठ्या प्रमाणात शेतीचे नुकसान झाले आहे. शेतकऱ्यांचे उभे पीक पाऊस व वाऱ्यामुळे आडवे झाले आहे. भातसा धरणाचे पाचही दरवाजे उघडल्यामुळे सापगांव व सावरशेत पुलावरून पाणी गेल्यामुळे जनजीवन ठप्प झाले आहे.

शहापूर तालुक्यात रात्री जोरदार पाऊस सुरु आहे. यामुळे काही ठिकाणी पूरस्थिती निर्माण झाली आहे. शहापूर तालुक्यात मागील काही दिवसांपासून पुन्हा एकदा पावसाचा हाहाकार पाहण्यास मिळत असून भातसा धरणाचे पाच दरवाजे अडीच मिटरने उघडण्यात आले आहेत. परिणामी सापगाव गावात नदीचे पाणी शिरल्याने संपूर्ण गाव पाण्याखाली गेले आहे. तर शहापूर- किन्हवली रस्ता बंद झाला असून ४० गावांचा संपर्क तुटला आहे. या पावसामुळे जनजीवन विस्कळीत झाले असून अनेक ठिकाणी जीवित व वित्तहानी झालेली आहे.संध्याकाळ पर्यंतदेखील पावसाने उघडीप दिलेली नसून पुढील काही दिवस जोरदार पावसाची शक्यता वर्तविण्यात आलेली आहे.

सततच्या पावसामुळे शेतकरी व रहिवाशांना प्रचंड नुकसानीची झळ सहन करावी लागत असून अनेकांचे संसार उघड्यावर आले आहेत.- नाल्यांना पूर आल्याने धरणाच्या पाणी पातळीत वाढ झाली आहे. परिणामी भातसा धरणाचे पाच दरवाजे अडीच मीटरने उघडण्यात आल्याने शहापूर सापगाव किन्हवली रस्त्यावरील पूल पाण्याखाली गेल्याने रस्ता बंद करण्यात आला आहे. यामुळे या रस्त्याने जोडले जाणाऱ्या ४० पेक्षा जास्त गाव-पाड्यांचा संपर्क तुटला आहे.

भातसा धरणातून सोडण्यात आलेल्या पाण्यामुळे शहापूर-सापगाव-किन्हवली रस्त्यावरचा पूल पाण्याखाली गेला असून, वाहतूक पूर्णपणे ठप्प झाली आहे. यामुळे या मार्गावरील सुमारे ४० गावांचा संपर्क तुटला आहे. दरम्यान, भातसा नदीतील पाणी सापगावात शिरल्याने गावातील मोठा परिसर पाण्याखाली गेला आहे.काबारे-पिवळी-वासिंद रस्त्यावरील सावरोली (खू) येथील पुलावर पिकअप गाडी पाण्यामध्ये अडकली होती. वाहक व चालक यांना सुरक्षित बाहेर काढण्यात यश आले. परिस्थिती गंभीर बनू नये म्हणून महसूल विभागाचे अधिकारी व जीवरक्षक पथक या ठिकाणी तैनात करण्यात आले आहेत. स्थानिक प्रशासनाकडून नागरिकांना सतर्क राहण्याचे आवाहन करण्यात आले असून, कोणतीही अनुचित घटना घडू नये यासाठी सर्व उपाययोजना करण्यात येत आहेत.

हवामान विभागाने पुढील काही दिवसांसाठी अजूनही जोरदार पावसाची शक्यता वर्तवली आहे. शेतकरी आणि नागरिकांनी सतर्क राहावे.काही अडचण असेल तर स्थानिक पातळीवरील प्रशासनाशी संपर्क साधावा. तसेच नुकसानग्रस्त भागात पंचनामे लवकरच सुरू करण्यात येणार आहेत, अशी माहिती शहापूर तालुक्याचे तहसीलदार परमेश्वर कासुले यांनी दिली.