नवी मुंबई: मागील काही दिवसांपासून जीवनावश्यक वस्तूच्या दरात वाढ होत चालली आहे. त्यात आता रोजच्या जेवणात लागणाऱ्या तांदळाने देखील उसळी घेतली असून एपीएमसी घाऊक बाजारात वाडा कोलम तांदूळ ८ ते १० रुपयांनी वधारले असून बासमती तांदूळ देखील १० ते १५ रुपयांनी वाढले आहेत.
वाशीतील एपीएमसी बाजारात दक्षिण भारतातून सर्वाधिक तांदळाची आवक होते. त्या पाठोपाठ राज्यातून नागपूर, ठाणे आदी जिल्ह्यातून कोलम तांदूळ आवक होते. तर उत्तर भारतातून बासमती तांदूळ येतो. मात्र दक्षिण भारतासह देशात इतरत्र पावसाने दडी मारली आहे. त्यामुळे यंदा तांदळाचे उत्पादन घटणार आहे. ही शक्यता लक्षात घेता तांदुळाची साठवणूक होत असून बाजारातील आवक घटली आहे.परिणामी रोजच्या मागणी प्रमाणे पुरवठा होत नाही.
बाजारात रोज.२५० ते ३०० गाड्या तांदळाच्या आवक होतात. मात्र त्यात ३० टक्क्यांनी घट झाली असून आवक २०० वर आली आहे. त्यामुळे दरात वाढ होत आहे. वाशीतील एपीएमसी धान्य मार्केटमध्ये कोलम तांदूळ ८ ते १० रुपयांनी तर बासमती तांदूळ १५ ते २०रुपयांनी महाग झाला आहे. इतर तांदळाच्या दरात देखील तुरळक वाढ झाल्याचे चित्र पाहायला मिळत आहे. तांदळाच्या कोलम, इंद्रायणी, स्टीम बासमती अशा अनेक जाती आहेत. मात्र ग्राहक ठराविक तांदळालाच जास्त पसंती देत असतात. सर्वाधिक मागणी ही वाडा कोलम तांदळाला असून तो ४४ ते ६४ रुपयांनी विकला जात आहे. तर बासमती तांदूळ ८५ ते १२० रुपयांपर्यंत विकला जात आहे.
बाजारात आवक अशीच कमी राहिली तर आगामी गणेशोत्सव आणि नवरात्रोत्सव या दरम्यान दर आणखी वाढण्याची शक्यता येथील व्यापाऱ्यांनी वर्तवली आहे.