शेतीची कामे खोळंबली
डोंबिवली : गेले चार दिवस पावसाने हुलकावणी दिल्यामुळे जिल्ह्यात शेतीचे काम थंडावले आहे. धरण क्षेत्रातही याचा परिणाम दिसून आला असून बारवी धरणात गेल्या वर्षीपेक्षा १० टक्के पाणीसाठा कमी आहे.
डोंबिवली शहराच्या आजूबाजूस असलेल्या गांवात आजही काही शेतकरी भातशेती करीत आहेत. मागील आठवड्यात पाऊस चांगला पडेल असे संकेत मिळाल्याने येथील शेतकऱ्यांनी भातशेतीच्या कामांस सुरुवात केली. पेरणीची कामे झाली असून आता भात लावलीचे काम करण्यासाठी तयारी झाली आहे. परंतु गेले चार दिवस पाऊस पडत नसल्याने शेतकऱ्यांना फक्त पावसाच्या प्रतिक्षेशिवाय पर्याय नाही. याबाबत उंबार्लि गावातील शेतकरी सुखदेव पाटील यांनी सांगितले की, आजही आम्ही घराला पुरेल एव्हढी भातशेती करतो. आता आम्ही नवीन तंत्रज्ञानाने शेती करतो. पण असे असले तरी पाऊस पडल्याशिवाय काहीच करता येत नाही.
पावसाने दडी मारल्याने त्याचा परिणाम धरण क्षेत्रातही झाला आहे. गेल्या वर्षी बारवी धरणात याच दिवशी पाण्याची पातळी 65.10 मीटर होती तर पाणी साठा 50.31 टक्के होता. पण आज रोजी धरणात पाण्याची पातळी 62.65 असून पाणी साठा फक्त 40 टक्के आहे. गेल्या वर्षीच्या तुलनेत या वर्षी याच दिवशी 10 टक्के पाणीसाठा कमी आहे अशी माहिती बारवीधरण अधिकारी यांच्याकडून मिळत आहे.