कल्याण: ‘एमसीएचआय-क्रेडाई’ कल्याण-डोंबिवली शाखेच्या बाराव्या गृहप्रकल्प प्रदर्शनाचे उद्घाटन गुरुवारी दुपारी कल्याण डोंबिवली पालिका आयुक्त डॉ. भाऊसाहेब दांगडे, कल्याण परिमंडळाचे पोलीस उपायुक्त सचिन गुंजाळ यांच्या उपस्थितीत झाले.
विकासकांनी शासनाच्या नवीन बांधकाम नियमांचा आधार घेऊन अधिकाधिक परवडणारी घरे नागरिकांना खरेदी करता येतील यादृष्टीने बांधकामांचे नियोजन करावे, असे मत आयुक्त दांगडे यांनी उद्घाटनानंतरच्या कार्यक्रमात व्यक्त केले.
कल्याण पश्चिमेतील लाल चौकी भागातील फडके मैदानावर हे गृह प्रकल्प प्रदर्शन भरविण्यात आले आहे. या कार्यक्रमाला प्रकल्पाचे समन्वयक दिनेश मेहता, अध्यक्ष भरत छेडा, सचिव अरविंद वरक, माजी अध्यक्ष रवी पाटील, सुनील पाटील, राहुल कदम, सुनील चव्हाण, स्मार्ट सिटी प्रकल्पाचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. प्रल्हाद रोडे याशिवाय ज्येष्ठ वास्तुविशारद राजीव तायशेट्ये, सातवळेकर, धनश्री भोसले उपस्थित होते.
६ ते ९ एप्रिल या कालावधीत हे प्रदर्शन सकाळी ११ ते रात्री नऊ वाजेपर्यंत नागरिकांना खुले राहणार आहे. कल्याण, डोंबिवली, बदलापूर, अंबरनाथ, शिळफाटा परिसरातील ४० विकासकांचे १५० हून अधिक गृहप्रकल्पांची मांडणी या प्रदर्शनात करण्यात आली आहे. चार दिवसांच्या कालावधीत २५ हजाराहून नागरिक या गृहप्रकल्पाला भेट देतील असा दावा संयोजकांनी केला आहे.
प्रदर्शनाचे उदघाटन झाल्यानंतर अर्ध्या तासात प्रदर्शनातील दोन गृह प्रकल्पात दोन घर खरेदी इच्छुकांनी घर खरेदीची नोंदणी केली. मुंबई परिसरातील घरांच्या चढ्या किमतीमुळे नागरिक आता ठाणे, कल्याण, डोंबिवली परिसरात घर खरेदीसाठी येत आहेत. अशा नागरिकांना त्यांच्या आर्थिक गणिताप्रमाणे किफायतशीर किमतीत घरे मिळाली तर ते तात्काळ घरे खरेदीला प्राधान्य देतात. अशाप्रकारची घरे तयार करण्यावर कल्याण, डोंबिवलीतील विकासक आघाडीवर आहेत. याचे समाधान आहे. त्यांचे प्रयत्न स्तुत्य आहेत, अशा शब्दात आयुक्त डॉ. दांगडे यांनी विकासकांच्या किफायतशीर घर प्रकल्पांवरुन कौतुक केले.
शहरांमध्ये अधिक प्रमाणात किफायतशीर घरे उपलब्ध झाली तर अधिकतर लोक अशा घरांमध्ये घर खरेदी करतात. या खरेदीमुळे शहरातील झोपडपट्टी वाढण्याला प्रतिबंध बसतो. शहराची बेढब वाढ थांबते. शहरांचा चौकटबध्द विकास व्हावा, प्रत्येकाला आपल्या हक्काचे घर असावे, या विचारातून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी समुह विकास गृहप्रकल्पांना प्राधान्य देण्याचे आदेश दिले आहेत, असे डॉ. दांगडे यांनी सांगितले.
कल्याण डोंबिवली पालिका हद्दीत मेट्रो, उड्डाण पूल, उन्नत मार्ग, वळण रस्ता याशिवाय इतर राज्यांमधील द्रुतमार्गी या शहरांमधून जात आहेत. त्यामुळे येत्या काळात कल्याण डोंबिवली हे दळणवळणाचे मोठे हब होईल, असा विश्वास आयुक्तांनी व्यक्त केला.
अनेक नागरिकांना घर खरेदी करण्याची इच्छा असते. पण मुंबई परिसरातील घरांच्या चढ्या किमतीमुळे तेथे त्यांना घर खरेदी करणे शक्य नसते. काही नागरिक मुंबई शहर परिसरात आपले दुसरे घर असावे या विचारातून मुंबईपासून एक तासाच्या अंतरावरील कल्याण, डोंबिवली, टिटवाळा, बदलापूर परिसरात आपल्या आर्थिक आवाक्यातील घर खरेदीसाठी प्रयत्न करतात. अशा आणि इतर नागरिकांना किफायतशीर घरे उपलब्ध व्हावीत या उद्देशातून या प्रकल्पाचे नियोजन केले आहे, असे ‘एमसीएचआय’चे रवी पाटील यांनी सांगितले.