ठाणे : मागिल दोन दिवस पडणाऱ्या पावसामुळे वातावरणात गारवा निर्माण झाला असून अवघ्या ४० दिवसांतच ठाण्यात एक हजार मिमी पावसाचा टप्पा पार झाला आहे. मागिल वर्षापेक्षा तीनशे मिमी जास्त पाऊस पडला आहे.
जून महिन्याच्या पहिल्या आठवड्यात पावसाला सुरुवात झाली होती. जोरदार पावसामुळे जनजीवन विस्कळीत झाले होते. काही दिवस विश्रांती घेतल्यानंतर पावसाने पुन्हा एकदा २० जूनपासून दमदार सुरुवात केली होती. मागिल काही दिवस पावसाने ठाण्यात दमदार हजेरी लावली. दर दिवशी काही प्रमाणात पाऊस पडत असून मागिल दोन दिवस ठाण्याला पावसाने झोडपून काढले आहे. संध्याकाळी ५ वाजेपर्यंत शहरात २५ मिमी इतका पाऊस झाला होता. आत्तापर्यंत एक हजार १४ मिमी इतका पाऊस पडला असून मागिल वर्षी ७३८ मिमी इतका पाऊस ठाणे शहरात पडला होता. शहरातील नालेसफाई चांगली झाल्याने एवढ्या मोठ्या प्रमाणावर पाऊस पडून देखिल ठाण्यात कुठेही पाणी तुंबल्याची घटना घडली नाही कि नाल्याचे पाणी रस्त्यावर वाहताना ठाणेकरांच्या नजरेस पडले नाही.