२० अतिधोकादायक इमारतींमध्ये शेकडो रहिवाशांचा जीव मुठीत

* दुर्घटना घडल्यास अधिकाऱ्यांवर कारवाई
* घरे रिकामी करा: ठामपा आयुक्त

ठाणे : शहरातील अतिधोकादायक सी १ श्रेणीमधील इमारतींमधील रहिवाशांनी पावसाळ्याच्या उर्वरित कालावधीसाठी सुरक्षेच्या दृष्टीने भोगवटा रिक्त करावा, असे आवाहन आज झालेल्या बैठकीत ठाणे महापालिका आयुक्त सौरभ राव यांनी दिले. शहरात अद्याप २० अतिधोकादायक इमारतींमध्ये शेकडो रहिवाशांचे वास्तव्य असल्याची माहिती मिळते.

पावसाळ्याच्या पार्श्वभूमीवर कोणतीही दुर्घटना घडून जीवितहानी होऊ नये यासाठी जीर्ण झालेल्या इमारतींमधील नागरिकांनी काळजी घ्यावी. त्यांच्या सुरक्षिततेच्या दृष्टीने हे आवश्यक आहे, असे आदेश मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिले आहेत. पावसाळ्यात इमारत दुर्घटना घडल्यास कोणत्याही अधिका-यांची गय केली जाणार नाही असेही निर्देश त्यांनी दिले असल्याचे आयुक्त सौरभ राव यांनी बैठकीत स्पष्ट केले. परंतु, अशा इमारतींमध्ये राहणारे नागरिक जर स्वतः जबाबदारी घेण्यास तयार असतील, तर त्यांनी दुरुस्ती करुन त्याची छायाचित्र संबंधित प्रभाग समितीमध्ये सादर करावी, असेही आयुक्त राव यांनी नमूद केले.

प्रत्येक प्रभाग समितीच्या हद्दीतील न्याय प्रविष्ठ तसेच तांत्रिक तपासणी करून कोणाच्याही कायदेशीर ताब्यास व्यत्यय न आणता, उर्वरीत कालावधीकरिता भोगवटा रिक्त करावा. कोणतीही जीवितहानी होऊ नये, प्रत्येक नागरिक हा सुरक्षित रहावा हाच महापालिकेचा हेतू असल्याचे आयुक्तांनी नमूद केले. ज्या इमारतींच्या तत्काळ दुरुस्तीची सुचना आधीच प्राप्त झाली आहे, अशा इमारतींबाबत कमिटींकडून स्थिरता अहवाल सात दिवसांच्या कालावधीत पाठविण्यात यावा, असेही आयुक्तांनी यावेळी सांगितले.

ठाणे महापालिका क्षेत्रात, ९६ अतिधोकादायक इमारती होत्या. त्यापैकी, ४७ रिक्त करण्यात आल्या आहेत. २९ इमारतींचे तळमजला बांधकाम कायम ठेवून वरचे मजले पाडण्यात आले आहेत. सुमारे २० इमारती अजूनही काही प्रमाणात व्याप्त आहेत.

सदर या बैठकीस अतिरिक्त आयुक्त प्रशांत रोडे, उपायुक्त जी.जी. गोदेपुरे, मनीष जोशी, दिनेश तायडे, शंकर पाटोळे तसेच सर्व प्रभाग समितीमधील संबंधित सहाय्यक आयुक्त उपस्थित होते.