मेट्रो स्थानकांची दैना
मुंबई : एका दिवसाच्या विश्रांतीनंतर मुंबई आणि ठाण्यामध्ये पुन्हा एकदा पावसाने जोरदार हजेरी लावल्याचे दिसून आले. मुंबई, ठाणे, नवी मुंबईत मुसळधार पाऊस सुरु आहे. मंगळवारी दिवसभर विश्रांती घेतल्यावर बुधवारी दुपारनंतर पावसाची जोरदार बॅटिंग सुरू झाली.
मुंबईत सुरू झालेल्या पावसामुळे मध्य रेल्वे 20 ते 25 मिनिटे उशिराने धावत आहे. तर पश्चिम रेल्वे 5 ते 10 मिनिटे विलंबाने धावत आहे. भिवंडी शहर आणि ग्रामीण भागात देखील जोरदार पाऊस सुरू आहे. मुंबईच्या पश्चिम उपनगरात दुपारनंतर सुरू झालेल्या मुसळधार पावसामुळे अंधेरी सबवे पाण्याखाली गेला. अंधेरी सबवेमध्ये दोन ते तीन फूट पाणी भरल्यामुळे तो वाहतुकीसाठी बंद करण्यात आला होता.
मुंबईत सुरू झालेल्या मुसळधार पावसामुळे मेट्रो 3 च्या आचार्य अत्रे मेट्रो स्थानकानंतर आता वरळी मेट्रो स्थानकातही छत गळती सुरू झाली आहे. वरळी मेट्रो स्थानकातील तिकीट काउंटरजवळ ही गळती सुरू झाली असून ती रोखण्यासाठी खाली बादली ठेवण्यात आल्याचं चित्र आहे. बादली भरल्यानंतर कर्मचाऱ्यांकडून पाणी बाहेर फेकले जात असून छत गळतीमुळे प्रवाशांमध्ये नाराजी दिसत आहे. आचार्य अत्रे मेट्रो स्थानकानंतर वरळी स्थानकावरही तातडीने लक्ष द्यावे, अशी प्रवासी वर्गाची मागणी आहे.
बुधवारी दुपारनंतर भिवंडीमध्ये जोरदार पाऊस सुरू झाला. मुसळधार पावसामुळे शहरात ठिकठिकाणी पाणी साचल्याचे दिसून आले. भाजी मार्केटसह तीनबत्ती परिसरात दीड ते दोन फुटांपर्यंत पाणी साचले. त्यामुळे बाजारात खरेदीसाठी गेलेल्या नागरिकांची चांगलीच तारांबळ उडाली.