बदलापूरमध्ये केमिकल कंपनीला भीषण आग; तीन कामगार होरपळले

बदलापूर: बदलापूर एमआयडीसीतील केमिकल कंपनीला लागलेल्या भीषण आगीत कंपनी जळून खाक झाली. या आगीत कोणतीही जीवितहानी झाली नसली तरी तीन कामगार जखमी झाले असून त्यांना उपचारार्थ उल्हासनगर मध्यवर्ती रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.
बदलापूर पूर्वेकडील एमआयडीसीतील कुळगाव-बदलापूर नगर परिषदेच्या अग्निशमन केंद्रासमोर गगनगिरी फार्मा केम प्रा.लि. ही कंपनी आहे. या कंपनीत आयपीए सॉलव्हंट हे केमिकल तयार केले जाते. रविवारी (ता.१२) सकाळी ११.२२ वा. च्या सुमारास या कंपनीत आग लागल्याचे समजताच लिडींग फायरमन शैलेश जगताप, अजित गुरव, महेश कांबळे, गफुर खान तडवी, रत्नाकर जावळे, विजय ढोक,दिलीप धोत्रे, रवींद्र जाधव आदी अग्निशमन जवानांनी घटनास्थळी धाव घेतली.
त्यावेळी आगीने भीषण स्वरूप धारण केले होते. धुराचे मोठ मोठे लोट पसरले होते. आगीचे भीषण स्वरूप लक्षात घेऊन आनंद नगर एमआयडीसी, अंबरनाथ नगर परिषद, उल्हासनगर महानगर पालिका आदींच्या अग्निशमन दलालाही पाचारण करण्यात आले. पाच अग्निशमन वाहने, दहा पाण्याचे टँकर, चार रुग्णवाहिका आदींच्या साहाय्याने आग विझवण्यात आली. अग्निशमन दलाच्या जवानांनी सकाळी ११.२० ते संध्याकाळी ४.२० पर्यंत सलग चार तास अथक प्रयत्न करून आग पूर्णपणे विझवली. या आगीत कोणतीही जीवितहानी झाली नाही. मात्र तीन कामगार जखमी झाले. एकाला किरकोळ भाजले आहे. तर कंपनीत आग लागल्यामुळे पहिल्या माळ्यावरून उड्या मारून बाहेर पडल्याने दोन कामगारांना फ्रॅक्चर झाले आहे. या आगीत संपूर्ण कंपनी जळून खाक झाली असल्याने कंपनीचे मोठे नुकसान झाले आहे. आगीचे निश्चित कारण मात्र समजू शकलेले नाही.
आगीनंतर धुराचे मोठे लोट हवेत पसरले. त्यामुळे एकच खळबळ उडाली. त्यावेळी आगीचे भीषण स्वरुप लक्षात घेता सुरक्षिततेचा उपाय म्हणून पोलिसांनी आग लागलेल्या कंपनीपासून ठराविक अंतरावर दोन्ही बाजूंनी वाहतूक बंद केली. लगतच्या अन्य कंपन्यांना धोका होऊ नये म्हणून  तत्काळ या कंपन्या बंद करून तेथील कामगारांना सुरक्षितस्थळी हलविले. या परिसरातील कॅन्टीनमध्ये असलेले गॅस सिलेंडरही सुरक्षित स्थळी हलविण्यात आले. वरिष्ठ पोलीस निरीक्षक पडवळ यांच्यासह अनेक अधिकारी व कर्मचारी या ठिकाणी तळ ठोकून होते.
तिथपर्यंत आग पोहचू दिली नाही
गगनगिरी फार्मा केम प्रा.लि. कंपनीत आयपीए सॉलव्हंट या केमिकलची टाकी होती. त्याला क्लोरीन गॅस कनेक्ट असतो. या टाकीपर्यंत आग पोहचली असती किंवा क्लोरिन वायू गळती झाली असती तर मोठी दुर्घटना घडली असती. तिथपर्यंत आग पोहचू नये यासाठी शैलेश जगताप व त्यांच्या सहकाऱ्यांनी सर्वतोपरी प्रयत्न केले आणि त्यात त्यांना यशही आले.