कारशेडच्या विरोधात ग्रामस्थ ठाम
भाईंदर: दहिसर ते भाईंदर मेट्रो ९ प्रकल्पाचे कारशेड भाईंदर पश्चिमेच्या राई, मुर्धा व मोर्वा या गावात उभारण्यात येणार आहे. हे कारशेड येथे उभारू नये तसेच यासाठी लागणारी जमीन विकास आराखड्यात आरक्षित करण्याविरोधात गावकऱ्यांनी हरकती दाखल केल्या आहेत. ही सुनावणी ३० जानेवारीला सुरू होणार होती, परंतु ती ३१ जानेवारीपासून २ फेब्रुवारीपर्यंत म्हणजे तीन दिवस चालणार आहे.
भाईंदर पश्चिमेच्या राई , मुर्धा, मोर्वा या गावातील तब्बल ३२ हेक्टर जमिनीवर दहिसर-भाईंदर मेट्रो ९ व अंधेरी-दहिसर मेट्रो ७ अ प्रकल्पासाठी मेट्रो कारशेड उभारण्यासाठी एमएमआरडीएने आरक्षित केली आहे. ही जमीन विकास आराखड्यात देखील आरक्षित करण्याच्या दृष्टीने सहसंचालक कोकण विभाग ह्यांनी सप्टेंबर महिन्यात हरकती सूचना मागवल्या होत्या. या जागेत कारशेड उभारल्यास शेत जमिनी बाधित होणार असल्याने त्याला विरोध करत जवळपास १२०० हरकती ग्रामस्थांकडून करण्यात आल्या होत्या.
या हरकतींवर येत्या ३१ जानेवारीपासून सहसंचालक कोकण विभाग नवी मुंबई येथे सुनावणी आयोजित केल्या जाणार होत्या. परंतु ही सुनावणीला मीरा भाईंदर शहरातच घेण्यात यावी, अशी मागणी ग्रामस्थांकडून केली होती. त्यानुसार ही सुनावणी मीरा भाईंदर महापालिका मुख्यालयात ३० जानेवारी ते १ फेब्रुवारीपर्यंत घेण्यात येणार होती. ती ३० ऐवजी ३१ जानेवारीला सुरू झाल्यामुळे २ फेब्रुवारीपर्यंत घेण्यात येणार आहे. पहिल्या दिवशी या सुनावणीला जवळपास ३५० ग्रामस्थ उपस्थित होते. पुढील दोन दिवस ही सुनावणी चालणार आहे. या सुनावणीचा अहवाल शासनाला पाठवण्यात येणार आहे. त्यानंतर पुढील निर्णय घेण्यात येणार आहे.
ही सुनावणी कोकण विभागाचे सहसंचालक नगररचना अधिकारी जितेंद्र भोपळे हे घेत आहेत, तर मीरा भाईंदर महापालिकेचे सहायक संचालक हेमंत ठाकूर, नगररचनाकार केशव शिंदे हे उपस्थित होते.
मोर्वा मेट्रो कारशेडच्या विरोधावर ग्रामस्थ ठाम
भाईंदरजवळील मोर्वा गावालगतच्या प्रस्तावित मेट्रो कारशेडला ठाम विरोध असल्याचे ग्रामस्थांनी सुनावणीतही स्पष्ट केले आहे. मुख्यमंत्र्यांनी कारशेड स्थलांतर करण्याचे मौखिक आदेश दिले असले, तरी जोपर्यंत यासंदर्भातले लेखी आदेश जारी होत नाहीत, तोपर्यंत कारशेडविरोधात संघर्ष सुरूच राहील, असा पवित्रा ग्रामस्थांनी घेतला आहे.