हर्षित जानवडकर ठरला शतकवीर

रिलायन्स ग्रुप आणि एल अँड टी विजय

ठाणे : सेंट्रल मैदानात मंगळवारी झालेल्या सामन्यांत रिलायन्स ग्रुप सर्व्हिसेसने महिंद्रा लॉजीस्टिकचा तर एल अँड टी संघाने मुकंद संघाचा पराभव केला. यंदाच्या ठाणेवैभव वासंतिक क्रिकेट करंडक स्पर्धेत पहिल्या शतकवीराचा मान महिंद्रा लॉजीस्टिकच्या हर्षित जानवडकर याला मिळाला.

ठाणेवैभव वासंतिक क्रिकेट करंडक स्पर्धेच्या क गटातील दुसऱ्या फेरीत लार्सन अँड टुब्रो संघाने मुकंद कंपनी संघाचा धुव्वा उडवला. एल अँड टी संघाने अवघ्या ११.३ षटकांत मुकंदने दिलेले आव्हान पूर्ण केले.

एल अँड टी संघाने नाणेफेक जिंकून मुकंद संघाला फलंदाजीसाठी पाचारण केले. पिच ओली असल्याने सामना उशिरा सुरू करावा लागला. त्यामुळे १५ षटके देण्यात आली. मुकंदने सहा गडी गमावून १०१ धावा केल्या. राजेश सुर्वे २९, संतोष भोर २६ आणि सागर शिंदे याने २४ धावा केल्या. एल अँड टी कडून अद्वैत लोटलीकर याने सर्वाधिक दोन गडी बाद केले. एल अँड टी संघाने हे आव्हान अवघ्या ११.३ षटकांत पार केले. कल्पेश येरळकर याने सर्वाधिक ४७ धावा केल्या.

दुसऱ्या सत्रात अ गटात पहिल्या फेरीत रिलायन्स ग्रुप सर्व्हिसेस विरुद्ध महिंद्रा लॉजीस्टिक असा सामना झाला.

महिंद्रा लॉजीस्टिकने नाणेफेक जिंकून क्षेत्ररक्षण स्वीकारले. रिलायन्सने २० षटकांत आठ गडी गमावून १९२ धावा केल्या. शुभम पुण्यार्थी याने सर्वाधिक ५६ तर भूषण मानकर याने ५३ धावा केल्या. महिंद्राच्या पंकज कोरी आणि प्रतीक गुप्ता यांनी प्रत्येकी दोन बळी घेतले.

महिंद्राच्या हर्षित जानवडकर याने २१ चौकरांच्या मदतीने ११४ धावा कुटल्या, मात्र या संघाला विजयाजवळ जाता आले नाही. २० षटकांत चार गड्यांच्या बदल्यात महिंद्रा लॉजीस्टिकला १८८ धावाच करता आल्या.