प्रधान सचिव दिपक कपूर यांचे प्रतिपादन
ठाणे : शासनाच्या प्रसिद्धीसाठी स्थानिक दैनिके नेहमीच सकारात्मक प्रतिसाद देत असतात. लघु व मध्यम दैनिकांच्या पत्रकारांचे अनेक समस्या आहेत. त्या समस्या सोडविण्यासाठी तसेच पत्रकारांसाठी कल्याणकारी योजना राबविण्यासाठी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे व माहिती व जनसंपर्कच्या राज्यमंत्री अदिती तटकरे हे प्रयत्नशील आहेत, असे प्रतिपादन माहिती व जनसंपर्क महासंचालनालयाचे प्रधान सचिव तथा महासंचालक दिपक कपूर यांनी आज येथे काढले.
कोंकण विभागीय माहिती कार्यालयाच्या वतीने ठाण्यातील टाऊन हॉल येथे भरविण्यात आलेल्या दोन वर्षे जनसेवेची या विभागीय प्रदर्शनास आज प्रधान सचिव श्री.कपूर यांनी भेट दिली. यावेळी त्यांनी स्थानिक पत्रकारांशी संवादही साधला.
यावेळी कोंकण विभागाचे उपसंचालक (माहिती) डॉ. गणेश मुळे, ठाणे जिल्हा माहिती अधिकारी अजय जाधव, रायगडे जिल्हा माहिती अधिकारी मनोज सानप, पालघरचे जिल्हा माहिती अधिकारी राहूल भालेराव, दै. ‘ठाणेवैभव’चे संपादक मिलिंद बल्लाळ यांच्यासह यांच्यासह स्थानिक पत्रकार-प्रतिनिधी उपस्थित होते.
श्री. कपूर यांनी प्रदर्शनाची पाहणी केली व आयोजनाबद्दल समाधान व्यक्त केले. ते म्हणाले की, या प्रदर्शनाच्या माध्यमातून शासनाची सकारात्मक कामे नागरिकांपर्यंत पोचण्यास मदत होत आहे. या उपक्रमास माध्यमांनी प्रसिद्धी देऊन जास्तीत जास्त नागरिकांपर्यंत ही माहिती पोहचवावी, असे आवाहनही त्यांनी केले.
सध्या माध्यमांचे स्वरुप बदलत आहे. चोवीस तास माहिती देणारी माध्यमे आल्यामुळे माहिती विभागाचे महत्त्वही वाढत आहे. राज्य शासनाची अधिकृत माहिती या माध्यमामार्फत जनतेपर्यंत पोचविण्यासाठी माहिती विभागाची भूमिका महत्त्वाची आहे. जलद व अधिकृत माहिती देण्यासाठी सोशल मिडियाचा प्रभावी वापर करण्यात येत असून सोशल मिडिया कक्ष आणखी बळकट करीत आहोत, असे त्यांनी यावेळी सांगितले.
श्री. कपूर म्हणाले की, स्थानिक पातळीवर घडामोडी शासनापर्यंत पोचविण्यात स्थानिक दैनिकांचे महत्त्वाची भूमिका आहे. त्यांच्याकडून अचूक माहिती व जनतेची मते शासनाला कळतात. त्यामुळे लघु व मध्यम दैनिकांच्या अडचणी सोडविण्यासाठी मुख्यमंत्री व विभागाच्या राज्यमंत्री आग्रही आहेत. लहान-मोठ्या दैनिकांच्या पत्रकारांचे अनेक प्रश्न आहेत. मात्र, मागील तीन महिन्यात पत्रकारांच्या वैद्यकीय बिलांची कामे तातडीने निकाली काढण्यात आली आहेत. पत्रकारांसाठी आणखी कोणत्या कल्याणकारी योजना आणता येतील यावर विचार सुरू आहे.
यावेळी पत्रकार संघाचे अध्यक्ष संजय पितळे, जनादेशचे कैलास म्हापदी हे देखील उपस्थित होते. पत्रकारांनी प्रधान सचिव महोदयांशी संवाद साधला. पत्रकारांना येणाऱ्या अडचणी, त्यांच्याशी संबंधित योजना याबद्दल यावेळी चर्चा झाली.