* चार सदस्यीय पॅनल पद्धत
* ठाणे महापालिका प्रशासन ॲक्टिव्ह मोडवर
ठाणे : ठाणे महापालिकेच्या सार्वत्रिक निवडणुकीची लगबग सुरु झाली असून घोडबंदर मार्गांवरून प्रभाग रचना सुरु होऊन मुंब्रा-दिवा भागात शेवट होणार असल्याची माहिती हाती आली आहे. लवकरच या कामाला सुरुवात होणार असून महापालिका प्रशासन बैठक घेऊन निवडणूक कामांचे वाटप करणार आहे.
महापालिकेची निवडणूक चार सदस्य पॅनेल पद्धतीने होणार आहे. २०१७ साली चारचे 32 प्रभाग आणि तीन सदस्यांचा एक असे एकूण ३३ पॅनेल होते. त्यावेळी प्रभागाची सुरुवात घोडबंदर मार्गांवरील गायमुख येथून झाली होती तर शेवटचा प्रभाग हा खर्डी येथिल तीनचा पॅनेल होता. २०११ची जनगणना गृहीत धरून किमान ४५ हजार मतदारांचा एक पॅनेल तयार करण्यात आला होता आत्ता देखिल तशाच प्रकारे प्रभागाची रचना केली जाणार आहे. मागील लोकसभा आणि विधानसभा मतदार संघातील मतदार या निवडणुकीत मतदान करणार असल्याने प्रत्येक पॅनेलमधील मतदारसंख्या वाढण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.
प्रभाग रचना करताना उत्तरेकडून सुरुवात केली जाणार आहे. उत्तरेकडून ईशान्य (उत्तर-पूर्व) त्यानंतर पूर्व दिशेकडून येऊन पूर्वेकडून पश्चिमकडून प्रभाग रचना करत सरकावे आणि शेवट दक्षिणेत करून प्रभागाचा नंबर देखिल त्याच प्रमाणे टाकावा अशी सूचना देखिल करण्यात आली आहे.
अनुसूचित जाती आणि जमातीच्या वस्तीचे विभाजन होणार नाही याची काळजी प्रभाग रचना करताना घ्यावी अशी सूचना देखिल काल काढण्यात आलेल्या अध्यादेशात करण्यात आली आहे.
महापालिका आयुक्त सौरभ राव यांच्या मार्गदर्शनाखाली निवडणुकीबाबत बैठक घेऊन त्यांच्या सूचनेनुसार प्रभाग रचनेचे काम केले जाणार असल्याचे महापालिकेतील एका वरिष्ठ अधिकाऱ्याने ‘ठाणेवैभव’ला सांगितले.
घरात बसून प्रभाग रचना नको
ठाण्याच्या अलिकडे आणि पलिकडे असा भेदभाव न करता लोकसंख्येच्या प्रमाणात प्रभागसंख्या निश्चित करण्यासाठी राजकीय दबाव दूर करण्यासाठी त्रयस्थ संस्थेकडून निवडणूक प्रभाग रचनेवर लक्ष ठेवण्याची मागणी राष्ट्रवादी शरद पवार गटाचे नेते आ डॉ जितेंद्र आव्हाड यांनी राज्य निवडणूक आयुक्त यांच्याकडे केली आहे.
ठाणे महापालिकेच्या प्रभाग रचनेचे काम सुरु केले जाणार आहे. मागील वेळेस राजकीय दबावाखाली ठाणे महापालिकेच्या अधिकाऱ्यांनी प्रभाग रचना केली होती. त्यावेळी कळवा, मुंब्रा, दिवा आणि शीळ या भागातील लोकसंख्या जास्त असतानाही सदस्य संख्या मात्र ठाणे शहरापेक्षा कमी ठेवण्यात आली होती. त्यावेळी हरकत घेतल्याने निवडणूक विभागाने ठाण्याच्या पल्याड प्रभाग संख्या वाढवली होती, परंतु ती प्रभाग रचना अमलात आणली गेली नाही. आता पुन्हा एकदा चार सदस्य पॅनेलकरिता प्रभाग रचना तयार करण्याचे काम महापालिकेतील अधिकारी करणार असून हे अधिकारी राजकीय दबावाखाली घरी बसून प्रभाग रचना करणार नाही याची दक्षता निवडणूक आयोगाने घ्यावी. पारदर्शक प्रभाग रचना करण्यासाठी या कामावर त्रयस्थ संस्थेमार्फत लक्ष ठेवावे. निवडणूक आयोगाच्या मार्गदर्शनाखाली प्रभाग रचना करावी, अशी मागणी आ.डॉ.आव्हाड यांनी केली आहे.