भाईंदर : एमएमआडीएने दहिसर ते भाईंदर व अंधेरी ते आंतरराष्ट्रीय विमानतळ दरम्यानच्या मेट्रो रेल्वेचे कारशेड भाईंदर येथील मुर्धा ते राई गावादरम्यानच्या 32 हेक्टर जागेत प्रस्तावित केले आहे. याअनुषंगाने येथील रस्त्याचे शहर विकास आराखड्यानुसार 30 मीटर रुंदीकरण आवश्यक असल्याचे वक्तव्य आ. गीता जैन यांनी प्रसार माध्यमांशी संवाद साधताना केले. यावरुन कारशेडला विरोध असलेल्या मुर्धा, राई व मोर्वा गावातील ग्रामस्थांमध्ये संभ्रम निर्माण झाला आहे.
यापुर्वी एमएमआरडीएने सुरू केलेल्या रस्ता रुंदीकरणास आ. जैन यांनीच विरोध केल्यानंतर त्यांनी पुन्हा याच रस्त्याचे समर्थन केल्याबाबत ग्रामस्थांनी तीव्र नाराजी व्यक्त केली आहे. अपक्ष म्हणून निवडून आलेल्या जैन सध्या सेनेच्या झेंड्याखाली लोकसेवा करीत आहेत. याच पक्षाचे आमदार प्रताप सरनाईक यांनी सुरू असलेल्या अर्थसंकल्पीय अधिवेशनात लक्षवेधी मांडून कारशेडच्या सुनावण्यांना स्थगिती आदेश मिळविला आहे. तर स्थानिक आ. गीता जैन यांनी रस्ता रुंदीकरणासह मेट्रो कारशेडचा अट्टाहास सुरू केल्याबाबत ग्रामस्थांमध्ये संभ्रम निर्माण झाला आहे. सुरूवातीला दहिसर ते भाईंदर दरम्यानच्या मेट्रो रेल्वेचे भाईंदर येथील शेवटचे स्थानक नेताजी सुभाषंचद्र बोस मैदान येथे नियोजित केले होते. तेथुनच मागील बाजूने मिठागर मार्गे मेट्रोचे कारशेड प्रस्तावित करण्यात आले होते. एमएमआरडीएने हा मार्ग रद्द करीत बोस मैदान ते उत्तन दरम्यानचा रस्ता रुंद करुन त्यामार्गे मेट्रो मार्ग नेण्याचा निर्णय घेतला असुन त्याचे कारशेड मुर्धा ते राई दरम्यानच्या 32 हेक्टर जागेत प्रस्तावित केले आहे. यात ग्रामस्थांची घरे, शेती, जागा आदी 400 हून अधिक बांधकामे बाधित होत आहेत. यामुळे ग्रामस्थांनी कारशेडला तीव्र विरोध करण्यास सुरुवात केली आहे. यापुर्वी एमएमआरडीएने 2019 मध्ये पालिकेच्या शहर विकास आराखड्यानुसार बोस मैदान ते उत्तन दरम्यानच्या सुमारे 9 मीटर रस्त्याचे 30 मीटर रुंदीकरण करण्यास सुरूवात केली होती. त्यात बाधित होणाय््राा 17 बाधितांना पालिकेने घरे दिल्याचा दावा केला आहे. रस्त्याच्या जागा संपादनाची जबाबदारी एमएमआरडीएने पालिकेकडे दिली होती. त्यावेळी आ. जैन यांनी पालिकेला पत्रव्यवहार करुन रस्त्याची निविदा ग्रामस्थांना विचारात न घेता तसेच त्यांना कोणताही मोबदला न देता काढण्यात आल्याने ती रद्द करण्याची मागणी केली होती. अखेर एमएमआरडीएने या रस्त्याचे काम बंद करुन आपला गाशा गुंडाळला. तीन वर्षानंतर एमएमआरडीएने याच रस्त्यावरुन मेट्रो नेण्याचा निर्णय घेत गावच्या परिसरातच कारशेड बांधण्याचा घाट घातला आहे. त्याला ग्रामस्थांनी तीव्र विरोध दर्शविण्यास सुरुवात केल्याने एमएमआरडीएने त्याचा सर्वे पोलिस बंदोबस्तात केला. तर रस्ता रुंदीकरणाच्या कार्यवाहीला देखील सुरुवात केल्याने ग्रामस्थांनी त्याला देखील विरोध सुरू केला आहे. असे असतानाही आ. जैन यांनी मेट्रो कारशेडसाठी रस्ता रुंदीकरण आवश्यक असल्याचे वक्तव्य केल्याने ग्रामस्थांमध्ये त्यांच्या या दुटप्पी भूमिकेबाबत संभ्रम निर्माण झाला आहे.
शहर विकास आराखड्यानुसार प्रस्तावित रस्त्याचे रुंदीकरण अनिवार्य ठरते. त्यातच एमएमआरडीएने मेट्रोसाठी रस्ता रुंदीकरणाचा निर्णय घेतल्याने यावर येत्या 21 मार्च रोजी एमएमआरडीए आयुक्तांसोबत बैैठकीचे आयोजन केले आहे. त्यात ग्रामस्थांचे नुकसान होऊ नये, यासाठी आग्रही भूमिका मांडली जाणार आहे. – आमदार गीता जैन