नवी मुंबई: राज्यातील लसणाचे उत्पादन घटले असून परराज्यातील आवक देखील कमी झाली आहे. त्यामुळे वाशीतील घाऊक कांदा-बटाटा बाजारात लसूण १५० ते २५० रुपये किलोवर गेला आहे. तर किरकोळ बाजारात २६० ते ४०० रुपये प्रतिकिलो गेल्याने गृहीणींच्या स्वयंपाक घरातील फोडणी महागली आहे.
महाराष्ट्रातील गावरान लसणाच्या लागवडीत गेल्या काही वर्षांपासून घट झाल्यामुळे परराज्यातील लसूण उत्पादक शेतकऱ्यांवर अवलंबून राहावे लागत आहे. आजमितीला राज्यातील सर्वच बाजार आवारात परराज्यातील आवक देखील कमी झाली आहे. मुंबई आणि उपनगरात लसणाला मोठी मागणी आहे.
मागणीच्या तुलनेत लसणाची आवक कमी प्रमाणावर होत गेल्याने गुजरात आणि मध्य प्रदेशातील शेतकऱ्यांनी लसूण विक्रीस पाठविण्यास सुरुवात केली. त्यामुळे बाजारात लसणाचे दर वधारले आहेत. वाशीतील एपीएमसी बाजारात मागील काही दिवसांपासून आठ ते दहा गाड्या आवक होत असून सोमवारी १० गाड्या आवक झाली. त्यामुळे मागणीच्या तुलनेत आवक कमी होत असल्याने दरात वाढ होत चालली आहे.
फेब्रुवारीच्या शेवटच्या आठवड्यापासून लसणाचे नवीन उत्पादन वाढणार असून बाजारात आवक वाढणार आहे. त्यावेळी दरात घसरण होईल, अशी माहिती कांदा-बटाटा व्यापारी मनोहर तोतलानी यांनी दिली.