फळेगावात वीज पडून चार वासरांचा मृत्यू

कल्याण: कल्याण तालुक्यातील मौजे फळेगाव येथे काल सायंकाळी सुमारे 4.30 च्या सुमारास आकाशात वादळ व विजांच्या कडकडाटासह जोरदार पाऊस सुरू असताना गुरुनाथ बांगर यांच्या बेड्यावर वीज पडल्याची दुर्दैवी घटना घडली. या आघातात चार वासरे जागीच मृत्यूमुखी पडली आहेत.

घटनेची माहिती मिळताच स्थानिक प्रशासन व पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. या दुर्घटनेत कोणतीही मानवी जीवितहानी झाली नाही. वीज पडल्यामुळे झालेल्या नुकसानीचा पंचनामा करण्यात आला असून, संबंधित अहवाल तयार करून तो पुढील कार्यवाहीसाठी सादर करण्याची तजवीज करण्यात आली आहे. प्रशासनाकडून शासकीय मदतीसाठी आवश्यक ती प्रक्रिया सुरू करण्यात येणार असल्याचे सांगण्यात आले.

गुरुनाथ बांगर यांच्या कुटुंबाला या घटनेने आर्थिक आणि मानसिक धक्का बसला असून, शासनाने तत्काळ मदत जाहीर करावी, अशी मागणी ग्रामस्थांकडून करण्यात येत आहे.