वनमंत्री गणेश नाईक यांच्या जनता दरबाराला उत्स्फूर्त प्रतिसाद

नवी मुंबई: राज्याचे वनमंत्री आणि पालघर जिल्ह्याचे पालकमंत्री गणेश नाईक यांनी दहा वर्षांनंतर पुन्हा जनता दरबाराची परंपरा सुरू केली. वाशी येथील विष्णुदास भावे नाट्यगृहात आज पार पडलेल्या या पहिल्याच जनता दरबाराला नागरिकांचा अभूतपूर्व प्रतिसाद मिळाला.

या दरबारात ठाणे जिल्ह्यासह मुंबई, व नवी मुंबईतील शेकडो नागरिक उपस्थित होते. महापालिका, सिडको, एमआयडीसी, पोलीस, वन विभागासह विविध शासकीय खात्यांचे वरिष्ठ अधिकारी देखील या वेळी उपस्थित होते. 400 हून अधिक नागरिकांनी आपल्या समस्या, निवेदने मांडली, त्यापैकी अनेक समस्यांचे तत्काळ निराकरण करण्यात आले, तर उर्वरित समस्या कालबद्धरित्या सोडविण्यात येणार आहेत. काही समस्या शासकीय आणि जिल्हास्तरावर बैठका घेऊन मार्गी लावण्यात येणार आहेत.

स्व. दि. बा. पाटील यांचे सुपुत्र अतुल पाटील यांनी जनता दरबारात भेट घेऊन नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाशी संबंधित प्रकल्पग्रस्तांच्या समस्या मांडल्या. यावर उत्तर देताना वनमंत्री गणेश नाईक यांनी स्पष्ट आश्वासन दिले की, नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाचे नामकरण स्व. दि. बा. पाटील असेच होईल. यासोबतच नैना प्रकल्पासंबंधी जे काही प्रश्न आहेत त्या संदर्भात मुख्यमंत्री महोदयांसमवेत बैठक घेण्याचे आश्वासन दिले. प्रकल्पग्रस्त बांधवांनी आपले निवेदन दिले असता गरजे पोटीची सर्व बांधकामे आणि एलआयजी, एमआयजी यांच्या जमिनी फ्री होल्ड करायला पाहिजेत, अशी भूमिका पुन्हा एकदा मांडली. जमिनी नियमित करण्याचा दर रेडी रेकनरच्या 15टक्के सरसकट सर्व अंतरासाठी समान असावा असेही त्यांनी सांगितले. यावेळी दिव्यांग नागरिकांनीही मंत्री गणेश नाईक यांची भेट घेऊन आपल्या अडचणी मांडल्या.

जनता दरबारात शासकीय यंत्रणांशी संबंधित प्रश्न, महापालिका व नागरी समस्या, पोलीस आणि कायदा-सुव्यवस्थेचे प्रश्न, प्रकल्पग्रस्तांचे मुद्दे, वनसंपत्ती व पर्यावरण विषयक तक्रारी आदी विषयांवर नागरिकांनी निवेदने सादर केली. एनएमएमटी आणि नवी मुंबई महापालिकेतील कंत्राटी कामगारांनी कायम करण्यासाठी मंत्री महोदयांना निवेदन दिले असता संबंधित आस्थापनेमध्ये दीर्घकाळ सेवा करणारे कर्मचारी कायम झाले पाहिजेत, असे सांगून या कामी शासकीय स्तरावर कार्यवाही करण्यात येईल अशी ग्वाही दिली.