‘फॉलो द मंकी’ मोहिमेद्वारे कचऱ्याचा प्रश्न मार्गी

७५ गृहसंकुलांतील पाच हजार कुटुंबांचा समावेश

ठाणे : कचऱ्याच्या प्रश्नावर शास्त्रशुद्ध पद्धतीने तोडगा काढून टप्प्याटप्प्याने त्याची अंमलबजावणी करण्याची मोहीम ठाणे महापालिका प्रशासनाने ‘आर निसर्ग’ या स्वयंसेवी संस्थेच्या मदतीने राबविण्यास सुरुवात केली आहे. या मोहिमेच्या पहिल्या टप्प्यात सध्या पोखरण रस्ता क्रमांक दोनलगत असलेल्या ७५ सोसायट्यांमधील पाच हजार कुटुंबांचा समावेश करण्यात आला आहे. या पाच हजार कुटुंबाकडून मिळणाऱ्या सर्व कचऱ्याचे प्रक्रिया आणि पुनर्वापराद्वारे व्यवस्थापन केले जात आहे.

टप्प्याटप्प्याने संपूर्ण शहरात ही मोहीम राबवली जाणार असून डम्पिंग ग्राऊंडशिवाय कचऱ्याचे यशस्वीरित्या व्यवस्थापन करून ठाणे शहर स्मार्ट सिटीच्या दिशेने दमदार पाऊल टाकेल, असा विश्वास या मोहिमेत सहभागी झालेल्या कचरा व्यवस्थापन तज्ज्ञांनी व्यक्त केला आहे.

‘फॉलो द मंकी’ असे या मोहिमेचे नाव असून २० जानेवारीपासून प्रायोगिक तत्वावर या विभागातून कचरा संकलित केला जात आहे. सध्या ओला आणि सुका अशा दोन प्रकारचा कचरा गोळा केला जात असून १ मार्चपासून घटक कचऱ्याचेही स्वतंत्रपणे संकलन केले जाणार आहे. त्यासाठी ‘आर निसर्ग’ चे पदाधिकारी सध्या संबंधित सोसायट्यांच्या पदाधिकाऱ्यांना मोहिमेविषयी प्रशिक्षण देत आहेत. आतापर्यंत पाच प्रशिक्षण कार्यशाळा झाल्या आहेत. गेल्या आठवड्यात सतीश प्रधान ज्ञानसाधना महाविद्यालयातील ‘एनसीसी’ आणि ‘एनएसएस’ च्या शंभर विद्यार्थ्यांनी या सोसायट्यांमध्ये या मोहिमेविषयी जनजागृती केली. त्यांनी ७५० घरांमध्ये जाऊन या कचरा वर्गीकरण मोहिमेचे वेगळेपण आणि वैशिट्य नागरिकांना समजावून सांगितले. तसेच त्यामुळे होणारे लाभही त्यांच्या लक्षात आणून दिले.

टाटा ग्लेनडेल, गौरव, मंदार, गुलमोहर, पोगम, चंपक, फलाश, प्राची, चंदन, औदुंबर, वसंत विहार, अनंत, त्रिवेणी, जाईजुई शाल्मली, कांचन, वैजयंता सोसायटी, लोकपुरम, सोनचाफा, रो-हाऊस, पंचवटी, अश्वथा, अर्जुन सोसायटी, एन्क्लेव्ह सोसायटी, सिद्धाचल फेज १ ते ८, जस्मिन तोवर, महावीर, मिलेनियम, केतकी, व्होल्टास कॉलनी या सोसायट्यांचा पहिल्या टप्प्यातील मोहिमेत सहभाग आहे.

सहभागी सोसायट्यांमधील सफाई कर्मचारी आणि घरकाम करणाऱ्या सेवकांसाठी ओळखपत्र दिले जाईल. या ओळख पत्राद्वारे त्यांना आणि त्यांच्या कुटुंबियांना खासगी रुग्णालयात ५० टक्के सवलतीत औषधोपचार मिळणार आहेत. तसेच रुग्णालयाच्या बिलात ३० टक्के सवलत मिळेल.

या मोहिमेत संकलित होणार ओला कचरा ऋतू पार्क येथील खत प्रकल्पात तर सुका कचरा ठाणे पूर्व विभागात समर्थ भारत केंद्रातील कचरा व्यवस्थापन केंद्रात दिला जातो. सध्या दोन्ही प्रकारचा मिळून दररोज पाच टन कचरा संकलित केला जात आहे. १ मार्चपासून संकलित होणारा घटक कचरा तळोजा येथील प्रक्रिया केंद्रात दिला जाणार आहे.

या मोहिमेत दोन घंटागाड्या वापरण्यात येत असून त्या खास सुशोभित करण्यात आल्या आहेत. या मोहिमेसाठी बनविण्यात आलेले ‘चला ठाणे बदलूया’ हे गाणे वाजवीत या घंटागाड्या सोसायट्यांमधून कचरा संकलित करतात. ओला आणि सुका कचरा स्वतंत्र घंटागाडीमध्ये संकलित केला जातो.

‘आर निसर्ग’चे स्वयंसेवक आणि महापालिका अधिकारी नियमितपणे या प्रकल्पाची देखरेख करीत आहेत. पोखरण रस्त्यावरील प्रकल्प यशस्वीरित्या कार्यान्वित झाला कि अन्य विभागातही अशा प्रकारे कचरा संकलित केला जाणार आहे. नागरिकांनी या मोहिमेला सकारात्मक प्रतिसाद द्यावा, असे आवाहन संस्थेच्या डॉ. लता घनश्यामनानी यांनी केले आहे.