बदलापूर: वांगणीकरांना गेल्या अनेक महिन्यांपासून प्रतिक्षा असलेला वांगणी रेल्वे स्थानकावरील रेल्वे पादचारी पुल अखेर प्रवाशांसाठी खुला झाला आहे. त्यामुळे रेल्वे पादचारी पुलाअभावी प्रवाशांची होणारी गैरसोय आता टळणार आहे. त्याचबरोबर रेल्वे रूळ ओलांडताना होणारे अपघातही टळणार आहेत.
गेल्या काही वर्षांत वांगणीची लोकसंख्या झपाट्याने वाढली असून नव्याने वास्तव्याला आलेले बहुतांश लोक हे चाकरमानी वर्गातील आहेत. स्वाभाविकच रेल्वे प्रवाशांच्या संख्येतही वाढ झाली आहे. त्यामुळे रेल्वे रुळ ओलांडून अपघात होण्याचे प्रकार टाळण्यासाठी वांगणी रेल्वे स्थानकात प्रशस्त पादचारी पूल उभारण्याची मागणी होत होती. नऊ डब्यांच्या लोकल बारा डबा करणार असाल तर कर्जत-कसारा मार्गावरील सर्व उपनगरी स्थानकावर किमान दोन पादचारी पूल उभारा अशी आग्रही मागणी वांगणी रेल्वे प्रवासी संघटनेने सर्व प्रथम रेल्वे बोर्डाकडे केली होती.
त्यानुसार आता सर्व ग्रामीण स्थानकावर दोन पूल उपलब्ध झालेले आहेत. आश्चर्य म्हणजे २००७ सालापर्यंत वांगणी रेल्वे स्थानकावर एकही पूल उपलब्ध नव्हता. मात्र प्रवासी संघटनेच्या सततच्या पाठपुरावा आणि संघर्षामुळे आज दोन पूल उपलब्ध झाले आहेत. पादचारी पुलाच्या मागणीसाठी काही वर्षांपूर्वी प्रवासी संघटनेचे अध्यक्ष मनोहर शेलार, पदाधिकारी डॉ.ताई पाटील प्रसिद्धीप्रमुख मयुरेश कडव तसेच रेल्वे प्रवासी संघटनेच्या सदस्यांनी आंदोलनही केले होते. या लढयाला अखेर यश आले आहे. १८ फेब्रुवारी पासून खुला झालेला नवीन पादचारी पूल हा कर्जत दिशेकडे असून मुंबई रेल्वे विकास महामंडळाने पुलाची उभारणी केली आहे. एमआरव्हीसीने रेल्वेला कामाच्या पूर्णत्वाचे पत्र दिले असून हा पूल कायमस्वरूपी खुला झाल्याचे रेल्वेच्या अधिकार्यांनी स्पष्ट केले आहे.
पुलाच्या कामाचे व्यवस्थापन पाहणारे एमआरव्हीसीचे वरीष्ठ अभियंता खरे आणि अभियंता पिल्ले यांना जलद आणि दर्जेदार काम केल्याबद्दल वांगणी रेल्वे प्रवासी संघटनेने धन्यवाद दिले आहेत. दरम्यान, वांगणी परिसरात अंध कुटुंबे मोठ्या प्रमाणात असून पुलाजवळ उभारलेल्या लिफ्ट सुरू कराव्यात, तसेच नवीन पुलासाठी लिफ्ट उभारण्याची मागणी वांगणी रेल्वे प्रवासी संघटनेने केली आहे.