वितरण व्यवस्थेत अडकले वसई-विरारकरांचे जादा पाणी!

जून महिन्यात मिळणार अतिरिक्त १८५ द.ल.लि. पाणी

भाईंदर: मार्च अखेरपर्यंत सुर्या प्रकल्पातील १८५ दशलक्ष लिटर अतिरिक्त पाणी आणण्याची घोषणा पोकळ ठरली आहे. वितरण व्यवस्थेचे काम पूर्ण न झाल्याने ते पाणी जूनपर्यंत मिळणार आहे. परिणामी यंदांच्या उन्हाळ्यात देखील वसईकरांना पाणीटंचाईच्या झळा सोसाव्या लागणार आहेत.
वसई-विरार शहराचे झपाट्याने नागरीकरण होत आहे. त्यामुळे शहरात पाण्याची मागणीही प्रचंड वाढली आहे. सध्या पालिकेकडे सुर्या, पेल्हार आणि उसगाव या तिन्ही धरणातून दररोज २३० दशलक्ष लीटर इतका पाणी पुरवठा केला जातो. मात्र मिळणारे पाणीही आता अपुरे पडू लागले आहे. त्यामुळे नागरिकांना पाणी टंचाईच्या समस्येला सामोरे जावे लागत आहे. शहरात पाण्याची समस्या सुटावी यासाठी मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाकडून (एमएमआरडीए) हाती घेण्यात आलेल्या सूर्या प्रादेशिक प्रकल्प ४०३ दशलक्ष लिटर्स पाण्याची योजना आहे. त्यातील वसई-विरार शहराला जवळपास १८५ दशलक्ष लीटर इतके पाणी उपलब्ध होणार आहे. एमएमआरडीएमार्फत हे पाणी महामार्गाजवळील काशिद कोपरपर्यंत आणले जाणार आहे. त्यानंतर एमबीआरमधून पाणी पालिकेकडून जलवाहिन्या अंथरून वितरित केले जाणार आहे. मार्च अखेरीसपर्यंत हे पाणी आणले जाणार असल्याचे जाहीर करण्यात आले होते. मात्र वितरण व्यवस्थेचे काम पूर्ण झाले मार्च महिना संपत आला तरीही हे काम अजूनही पूर्ण न झाल्याने १८५ मिळणारे अतिरिक्त पाणी लांबणीवर पडले आहे.
सूर्याप्रकल्पातून मिळणारे १८५ एमएलडी पाणी शहरात आणण्यासाठी जलवाहिन्या अंथरण्याचे काम सुरू आहे. हे काम पूर्ण होऊन नागरिकांना पाणी मिळण्यासाठी जून महिन्यापर्यंत प्रतिक्षा करावी लागणार आहे.