सॅटिसचे काम, तीन वर्षे थांब
ठाणे : ठाणे पूर्वेकडे गेल्या कित्येक महिन्यांपासून सुरु असलेल्या सॅटिस- २ च्या विविध कामांमुळे पूर्वेकडील रहिवासी आणि स्थानिक रिक्षाचालक, वाहन चालक कमालीचे वैतागले आहेत. सॅटिसची सर्व कामे हातावेगळी करण्यासाठी किमान तीन वर्षे लागणार असल्याने नागरिकांना वाली कोण असा प्रश्न उपस्थित केला जात आहे.
ठाणे पूर्वेला सॅटिसच्या विविध कामांनी वेग घेतला असला तरी, वाहनांच्या दररोजच्या कोंडीमुळे पादचा-यांना सकाळपासून रात्री उशीरापर्यंत जीव मुठीत धरून चालावे लागते. विशेषत: बेशिस्त रिक्षा चालकांना आवरण्यासाठी किमान वाहतूक पोलिस तैनात करावेत, अशी मागणी स्थानिक रहिवासी करत आहेत. परंतु, सध्या वाहतूक पोलिसांची संख्या कमी असल्याने येथे पुरेसे वाहतूक पोलिस देता येणार नाहीत, अशी माहिती अधिका-यांनी दिली.
ठाणे महानगरपालिका ठाणे स्थानकाच्या पूर्वेकडे सॅटिसची (स्टेशन एरिया ट्रॅफिक इम्प्रुव्हमेंट स्कीम) कामे करत आहे. सुरू असलेल्या कामांमुळे ठाणे स्थानकात बुकिंग कार्यालयाजवळील पूर्वेकडून प्रवेश करण्यासाठीचा रस्ता काम संपेपर्यंत तात्पुरता बंद ठेवण्यात आला आहे, असे मध्य रेल्वेच्या संबंधित अधिका-याने सांगितले. परंतु, बुकिंग कार्यालयाजवळील पूर्वेकडून प्रवेश करण्यासाठीचा रस्ता बंद ठेवण्यात आलेला नाही. ठाणे पूर्वेकडून तिकीट, पास घेण्यासाठी दोनही प्रवेश रस्ते खुले आहेत. प्रवासी तेथून तिकीटघरांशी जाऊ शकतात, असा खुलासा ठाणे महापालिकेच्या अधिका-याने केला.
ही पायाभूत सुविधांची कामे प्रवाशांच्या मुक्त प्रवाहासाठी आणि सुरक्षिततेसाठी आवश्यक आहेत. प्रवाशांना विनंती करण्यात येते की, त्यामुळे होणा-या या गैरसोयीबद्दल रेल्वे प्रशासनास सहकार्य करावे, ही उद्घोषणा ऐकून ऐकून ठाणेकरांचे ‘कान किटले’ आहेत.
पूर्वेकडील रहिवाशांसाठी पादचारी पूल नाही
ठाणे पूर्वेला राहणा-या अगणित रहिवाशांना, प्रवाशांना पश्चिमेला जाण्यासाठी ‘द्रवीडी प्राणायाम’करावा लागत आहे. आनंद सिनेमासमोर असलेला फक्त पादचारी पूल गेल्या वर्षापासून कायमचा तोडला आहे. हा पूल तोडल्यामुळे रहिवासी ‘सीएसटी एंड’ कडे असलेल्या पादचारी पुलावरून पश्चिमेला जातात. मात्र काहीवेळी या पुलावर मध्य रेल्वेचे तिकीट तपासनीस त्यांच्याकडे तिकीट किंवा पासची मागणी करतात. त्यांच्याकडे यापैकी एकही पुरावा नसल्याने त्यांच्यावर दंडात्मक कारवाई केली जात असल्याचे ‘ठाणेवैभव’च्या प्रतिनिधीने पाहिले. ‘स्थानिक रहिवाशांसंबंधी असे प्रकार बरेचदा होत असल्याची कबूली रेल्वेच्या एका अधिका-याने दिली. मात्र काही प्रवासी तिकीट किंवा पास नसतानाही तपासनीसांशी हुज्जत घालतात. मी पश्चिमेकडून पूर्वेला जात आहे, अशीही थाप मारतात, असे हा अधिकारी म्हणाला.
कल्याणकडील अर्धा पूल बिनकामाचा
कल्याण दिशेला असलेला पादचारी पूल फलाट क्र. १ ते १० पर्यंत अखंड होता. तो रेल्वे प्रशासनाने मधोमध तोडला आहे. फलाट क्र. १० ते ७ पर्यंतच तो खुला असल्यामुळे फलाट क्र. ६ वर जाऊ इच्छिणा-या प्रवाशांना पुन्हा पाय-या चढून फलाट ६ ते १पर्यंत जाता येते. मात्र यामुळे प्रवाशांचा वेळ जातो. याकडे मध्य रेल्वेचे संबंधित अधिकारी कधी लक्ष घालणार, असा प्रश्न ठाणेकर व्यक्त करतात.