सूर्या पाणीपुरवठा योजनेला मंत्रिमंडळाकडून ‘ऊर्जा’

* ११६ कोटींच्या कर्ज उभारणीला मंजुरी
* पुढील २५ वर्षे पाण्याची चिंता मिटणार

भाईंदर: मीरा-भाईंदर शहरासाठी सूर्या प्रकल्प पाणीपुरवठा योजनेचे काम सुरू आहे. या योजनेच्या जलवाहिनीचे आणि टाक्यांचे सुमारे ६५ टक्के काम पूर्ण होत आले आहे. या पार्श्वभूमीवर उर्वरित कामासाठी ११६ कोटी रुपयांचा निधी उभा करण्यासाठी मंजुरी देण्यात आली.

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली पार पडलेल्या बैठकीत चार महत्वाचे निर्णय घेण्यात आले आहेत. यामध्ये मीरा-भाईंदर महानगरपालिकेच्या पाणीपुरवठा प्रकल्पासाठी 116 कोटी रुपये कर्ज उभारणी करण्याचा निर्णय आजच्या मंत्रिमंडळाच्या बैठकीत घेण्यात आला आहे.

सूर्या प्रादेशिक पाणीपुरवठा योजनेवर आधारित वाढीव मुख्य जलवाहिन्या व वितरण व्यवस्थेचे काम सुरु आहे. केंद्र शासन पुरस्कृत अमृत 20 अभियानांतर्गत या कामास रु.516.78 कोटींची प्रशासकीय मान्यता मिळालेली आहे. त्यानुसार योजनेची कामे प्रगतीपथावर असून जानेवारी 2025 अखेर कामाची प्रगती 53 टक्के इतकी झालेली आहे. या योजनेतून मीरा-भाईंदर शहराची भविष्यातील सन 2054 पर्यंतची पाण्याची मागणी पूर्ण होईल. तसेच या योजनेची कामे पूर्ण होताच शहरातील पाण्याची टंचाई कायम स्वरूपी दूर होणार आहे.

कर्ज उभारणीसाठी मंजुरी देण्यात आल्याने या योजनेला अधिक गती प्राप्त झाली आहे. निधी उपलब्ध झाल्यावर पाणी पुरवठा योजनेच्या उर्वरित कामास चालना मिळणार असून पाचवीला पुजलेली पाणीटंचाई पुढील काळात दूर होणार आहे.