सुप्रसिद्ध अभिनेते शाहरूख खान याचा मुलगा आर्यन आणि त्याच्या साथीदारांविरूद्ध अंमली पदार्थ नियंत्रण विभागाने सुरू केलेल्या कारवाईस आता नाट्यमय कलाटणी मिळाली आहे. या विभागाचे विभागीय संचालक समीर वानखेडे यांनी केलेल्या कारवाईनंतर ते प्रसिद्धीच्या झोतात आले. त्यांच्या सचोटीचा आणि निर्मिळपणाचा गौरव करण्यात आला. एकीकडे जनतेकडून कौतुकाचा वर्षाव सुरू असताना त्यांच्याविरूद्ध आरोप होऊ लागले असून त्यांच्याभोवती संशयाचे ढग जमा होऊ लागले आहेत. आर्यन सध्या तुरूंगात असून माध्यमांनी या हाय-प्रोफाईल प्रकरणाला राष्ट्रीय मुद्दा असल्यासारखी ‘ट्रिटमेंट’ दिली आहे. त्यामुळे आर्यनला विनाकारण तर गोवण्यात आले नाही ना, अशी शंका जनतेला येऊ लागली होती. त्यातच या प्रकरणातील पंचाने अंमली पदार्थ विभागावर गंभीर आरोप केले. पाठोपाठ राष्ट्रवादी काँग्रेसचे नवाब मलिक यांनी वानखेडेंना लक्ष्य केले. यामुळे गोंधहाचे वातावरण तयार झाले आहे. जसे सुशांतसिंग राठोड संशयास्पद मृत्यूप्रकरणी झाले तसाच काहीसा प्रकार आता सुरू झाले आहे.
अशा हाय-प्रोफाईल प्रकरणांचा शेवट कसा होतो हे बर्याचदा कळत नाही. सुरूवातीला खमंग वाटणारे हे पदार्थ कालांतराने त्याहून खुसखुशीत जिन्नस पुढ्यात आले की शिळे वाटू लागतात तसा हा मामला आहे. परंतु त्यामुळे भारतातील राजकारणी, अंमलबजावणी अधिकारी, माध्यमे आणि सेलिब्रेटी मंडळी देशातील कायद्याचे कसे धिंडवडे काढतात हे चिंताजनक आहे. प्रत्येक गोष्टीत राजकीय हस्तक्षेप होऊ लागला आहे, असे म्हणावे तर अंमलबजावणी अधिकारी संशयाचे ढग स्वतःभोवती जमा का करतात हाही प्रश्न निर्माण होतो. यामुळे सर्व संबंधितांची विश्वासर्हता धसास लागते हे लक्षातच घेतले जात नाही. गुन्हा करणारी माणसे अनेकदा या अस्थिर परिस्थितीचा फायदा घेऊन मोकाट सुटतात आणि कायदा-सुव्यवस्था राखणार्या आव्हान देत राहतात. ही बाब देशाच्या भवितव्यासाठी घातक आहे. अंमली पदार्थाचे सेवन बेकायदेशीर असतात त्याचे इतका उघडपणे कळत-नकळत समर्थन कसे काय होऊ शकते हा प्रश्नच आहे. इंग्रजीत एक म्हण आहे, ‘Let law take its own course’, परंतु कायद्याला आपापल्या सोयीनुसार वाकवण्यातच जिथे धन्यता समजली जाते, तिथे या उक्तीला अर्थ रहात नाही, हे तितकेच खरे!