पुरस्कारामुळे मानकऱ्याच्या भोवती वलय वाढते की मानकऱ्याच्या अजोड कर्तृत्वाने पुरस्काराची उंची वाढते असे प्रश्न नेहमीच उपस्थित होत आले आहेत. भारत सरकारतर्फे देण्यात आलेल्या पद्म पुरस्कारातील काही मानकरी लक्षात घेतले तर सन्मानासाठी असलेल्या निवड पद्धतीमधील निकष बदलले आहेत, असेच म्हणावे लागेल. त्यामुळे महाराष्ट्रातून समाजसेवक पोपटराव पवार असोत की कृषी क्षेत्रात लक्षणीय कामगिरी बजावणाऱ्या राहीबाई पोपेरे, त्यांना सन्मान मिळाल्यामुळे पुरस्काराची उंची वाढली आहे असे म्हणावे लागेल. प्रसिद्धीच्या झोतापासून दूर डोंगर-दऱ्यात आणि दुर्गम अशा गावांत मानवतावादी काम करणाऱ्या अनेकांचा गौरव करून शासन सच्च्या कार्यकर्त्यांना वाऱ्यावर सोडून देत नाही, असा जणू संकेत दिला आहे. पश्चिम बंगालमधील अरुणोदय मोेंडल, कर्नाटकात संत्री विकणारा हरेकला हजबा याने त्याच्या गावातील गरीब मुलांना इंग्रजी बोलता यावे या ध्येयाने तुटपुंज्या कमाईतूनही शाळा उभी केली. मोहम्मद शरीफ याने आतापर्यंत बेवारशी अशा २५ हजारांवर अनोळखी मृतदेहांचे अंत्यसंस्कार केले. भोपाळ वायुदुर्घटनेत स्वतःची दृष्टी बाधित होऊनही अब्दुल जब्बार खान हे मृतांच्या नातेवाईकांना आजही मदत मिळवून देत आहेत. रवी कन्नन यांनी आसामच्या बराक खोऱ्यात कर्करोगग्रस्तांना मदतीचा हात दिला, अशा एकाहून एक निःस्वार्थ सुहृदयांची या वर्षीच्या पद्म पुरस्कारासाठी निवड करून सरकारने एक प्रकारे समाजासमोर प्रेरणास्त्रोत तयार केले आहेत.
याचा अर्थ ज्या उद्योजकांना, खेळाडूंना, कलाकारांना किंवा नेतेमंडळींना पुरस्कार मिळाले ते त्यास लायक नव्हते असे आम्ही अजिबात म्हणणार नाही. पी.व्ही. सिंधू,मेरी कोम, राणी रामपाल,सुरेश वाडकर, सुषमा स्वराज,मनोहर पर्रीकर,अरुण जेटली, जॉर्ज फर्नांडिस,आनंद महिंद्रा प्रभृतींनी त्यांच्या परीने देशात स्वकर्तृत्वाचे मापदंड निर्माण केले आणि त्याची यथोचित दखल घेण्यात आली. प्रसिद्धीपासून अक्षरशः हजारो मैल दूर असणाऱ्या पुरस्कार विजेत्यांना गौरवून एक नवा पायंडा सरकारने घातला याचे कौतुक वाटते. कोणत्याही पुरस्काराची अभिलाषा न बाळगता चांगल्या कामात सातत्य ठेवणाऱ्या या सर्व ‘पद्म’ विभूषितांना म्हणूनच सलाम. देश परिपक्व होत असल्याचे आणि पुरस्काराचे वजन वाढल्याचे हे प्रतिक आहे.