दारात पणती आणि कंदिल लावून प्रातिनिधीक स्वरुपात आपण दिवाळीनामक एक रुपक वर्षानुवर्षे जपत आलो आहोत. जल्लोषात साजरे करीत आलो आहोत! त्याला दिवाळी हे नाव आपणच ठेवले आणि जगभरातील भारतीय मोठ्या उत्साहाने या सणाची आतुरतेने वाट पहातात. परंतु गेल्या काही महिन्यांत कोरोनाच्या भीषण संकटाने प्रकाशाचे स्त्रोत आपल्यातून हिरावून घेतले होते. हे रूपकच जणू नष्ट करून टाकले. मनात काळाकुट्ट अंधार पसरला होता. आता मात्र हे संकट हळूहळू आपल्या आयुष्यातून निघून जात असल्याचे सुचिन्ह दिसू लागली असून पुन्हा एकदा दारादारात रांगोळी घालून, पणत्या तेजवून आणि रंगीबेरंगी कंदील लटकवून आपण त्या जुन्या आनंदक्षणांचे उत्साहाने स्वागत करण्यास सज्ज झालो आहोत. ठाणेवैभव च्या समस्त वाचक, वितरक, जाहीरातदार आणि हितचिंतकांना दिवाळीच्या मनोमन शुभेच्छा.
कोरोनामुळे अनिश्चिततेच्या चिखलात अडकलेला प्रगती आणि उत्कर्षाचा रथ आपण परिश्रमपूर्वकपणे बाहेर काढला आहे. तो पुन्हा रुतणार नाही याची काळजीही घेत आहोत. त्यामुळे कोरोनाकाळातील सर्व निर्बंधांचे पालन करण्यात आपण कुचराई करता कामा नये. थैमान घालणार्या त्या भयावह विषाणूस पुन्हा डोके वर काढण्याची संधी मिळता कामा नये. या निश्चयाने आपण हा सण उत्साहात सादर करू या.
दिवाळी म्हणजे फक्त रोषणाई, फराळ, नवीन कपडेलत्ते, खरेदी असा सीमित अर्थ काढणे चुकीचे ठरेल. कोरोनाने इतक्या कठोरपणे आपल्याला आयुष्यभर पुरेल असा धडा शिकवला असून आयुष्याकडे बघण्याचा नवा दृष्टीकोनही दिला आहे. सजगतेचे नवे कपडे आपण आज अंगावर घातले आहे, ते या महासाथीमुळेच. सकारात्मकतेची पणती आणि त्यात निर्धाराची वात पेट आली तीही कोरोनामुळेच. माणुसकीचा सोहळा आपल्याला अनुभवायला मिळाला तोही याच कोरोनामुळे. असे बरेच काही आणि तेही मोठी किंमत वसूल करून कोरोनाने आपल्याला दिले आहे. ते सर्व दु:खाचे, यातनांचे आणि वैफल्याचे क्षण आपण आता आयुष्यातून बाहेर काढण्यासाठी सज्ज झालो आहोत.
दिवाळीत भेटी देण्याची प्रथा आहे. परंतु कोरोनाने जीवन समजून घेण्याचे सजगता मानवाला भेटरुपाने दिली. हे आपण लक्षात ठेवले तर दिवाळीनंतरचा प्रत्येक दिवस आपण अधिक जबाबदारीने जगून खर्या अर्थाने जीवनोत्सव साजरा करू शकु.
पुन्हा एकदा दीपावलीच्या हार्दिक शुभेच्छा!