घालीन लोटांगण, खेळेन आयपीएल!

जगज्जेते असा लौकिक मिळवणार्‍या भारतीय क्रिकेट संघाची लागोपाठच्या दोन पराभवांमुळे, आणि तेही दारूण, अशी धुळधाण होईल असे कधी वाटले नव्हते. खेळात हार-जीत होत असते, त्यामुळे विजयचा उन्मादही चांगला नाही आणि पराभवामुळे वैफल्यग्रस्त होणेही उचित नाही. दोन्ही गोष्टी परिपक्वपणे स्वीकारणे हे खर्‍या क्रीडारसिकाचे लक्षण मानले जाते. त्यामुळे आम्ही या पराभवांमुळे व्यथित जरी झालो असलो तरी जिंकणार्‍या संघाचे कौतुकही करीत आहोत. असे करताना मात्र काही निरीक्षणे नोंदवणे आवश्यक वाटते.

पाकिस्तानविरुध्द स्पर्धेतील पहिल्याच सामन्यात झालेला पराभव जिव्हारी लागणाराच होता. मान्य की, पाकिस्तानने उत्तम गोलंदाजी केली आणि फलंदाजांनी त्यास न्याय दिला. परंतु आपल्या गोलंदाजांना एकही बळी घेता येऊ नये याचे कोडे मात्र तमाम क्रिकेटरसिकांना अस्वस्थ करून गेले. क्रिकेटच्या मैदानात उतरल्यावर आपले फलंदाज बालपणीचा घसरगुंडीचा खेळ खेळण्याची हौस कशी काय भागवू शकतात, हा दुसरा प्रश्‍न. बरे एकदा खेळला तर समजून घेऊ, न्यूझिलंड विरुध्द अ‍ॅक्शन रिप्लेचा सोस कशासाठी? तरी न्युझिलंडचे दोन बळी मिळवल्यामुळे थोडीफार लाज राखली गेली. दोन पराभवांचे ओझे घेऊन भारतीय संघ आता अफगाणिस्तानविरुध्द खेळेल तेव्हा तमाम भारतीय रसिक देव पाण्यात ठेऊन विजयासाठी प्रार्थना करतील. काही जणांनी हा नादही सोडून देण्याचे ठरवले आहे म्हणे. कोण उगाचच दिवाळी खराब करून घेईल?

पराभवाची कारणमीमांसा मात्र व्हायलाच हवी. त्यामागे असंख्य सबबी सांगितल्या जात आहेत, नाणेफेकीचा कौल आपल्या बाजूने लागला नाही ते दवामुळे ओला झालेला चेंडू निष्प्रभ ठरला असे आता बोलले जाऊ लागेल. पण त्यामुळे खरेखुरे कारण लपणार नाही. खरे कारण असे आहे की ज्या आयपीएल स्पर्धेमुळे खरे तर 20 षटकांतील सामन्यांना लागणारी शक्तीस्थळे बळकट व्हायला हवीत ती प्रत्यक्षात दुबळी ठरली. कोट्यवधी रुपयांचे करार केल्यावर संघाच्या मालकाला रिसल्ट द्यायला नको? त्यासाठी जीव तोडून आपले क्रिकेटपटू खेळले आणि प्रत्यक्षात देशासाठी खेळताना त्यांच्या छातीमधील भाते तुटले आणि चौकार-षटकारांची आतषबाजी करणारे रडतकढत एक-एक धावा जमवू लागले. हवा गेलेल्या पंक्चर टायरसारखी अवस्था संपूर्ण संघाची झाली होती. आपल्याला आयपीएल भोवले असेच म्हणावे लागेल. देशासाठी खेळताना म्हणुनच घालीन लोटांगण म्हणत संघाने सामुहिक आरती (की हाराकिरी?) केली!

संघ विजयी झाल्यावर त्यांच्यावर बक्षिसांची खैरात होते. मग पराभव झाल्यावर त्यांच्याकडून भरपाई का मागितली जाऊ नये?