रखडलेल्या मान्सूनमुळे सीताफळाचा हंगाम लांबला

नवी मुंबई: मात्र यंदा मान्सून लांबल्याने वाशीतील एपीएमसी बाजारात सीताफळाच्या हंगामाला उशिर झाला आहे. बाजारात सीताफळाचे अवघ्या १५० पेट्या दाखल होत आहेत. फळ बाजारात जूनमध्ये सीताफळ दाखल होण्यास सुरुवात होते. तर जुलै आणि ऑगस्ट महिन्यात या फळाची आवक वाढण्यास सुरुवात होते, अशी माहिती येथील फळ व्यापाऱ्यांनी दिली.

सीताफळ हे महाराष्ट्रातून पुणे व नगर जिल्ह्यातून दाखल होत असून नोव्हेंबर महिन्यापर्यंत या फळाचा हंगाम सुरू असतो. १५ जूननंतर बाजारात सीताफळ दाखल होण्यास सुरुवात होते, तर जुलै-ऑगस्टमध्ये आवक वाढते. मात्र यंदा मान्सून लांबला असल्याने सीताफळाच्या हंगामाला ही १५-२० दिवस उशिराने सुरुवात होणार असून १५ जुलैनंतर बाजारात आवक वाढेल, असे मत व्यापारी संजय पिंपळे यांनी व्यक्त केले आहे. सीताफळाचा हंगाम चार महिने असतो. सीताफळ उत्पादक शेतकरी फेब्रुवारी आणि मार्च महिन्यात छाटणी करीत असतात. त्यांनतर साधारण एक महिन्याच्या कालावधीत पिकाला पाणी देण्यात येत नाही. त्यानंतर मात्र या पिकाला पाण्याची, पावसाची अधिक गरज भासते. सीताफळ परिपक्व होण्यासाठी चार ते साडे चार महिन्याचा कलावधी जातो. पावसाचे प्रमाण कमी झाल्याने पीकाला पोषक वातावरण उपलब्ध होत नाही. परिणामी पीक उत्पादन घेण्यास उशीर लागत आहे. यंदा मान्सून लांबला आहे, त्यामुळे पिकाला पोषक वातावरण उपलब्ध होत नसल्याने हंगामाला विलंब होईल, असे मत व्यक्त होत आहे.

सीताफळाची चांगली वाढ तसेच परिपक्व होण्यासाठी जास्त पाणी लागते. जादा पाणी सीताफळ पीकाला पूरक वातावरण निर्मिती करते. त्यामुळे फळ परिपक्कव व आकाराने मोठे होते. पाण्याचा अभाव असलेल्या पीक उत्पादनाला परिपक्कव होण्यासाठी विलंब लागतो, त्याचबरोबर त्या फळाची वाढ खुंटते. सध्या बाजारात १५० पेट्या दाखल होत असून प्रतकिलो १४०-२०० रुपयांनी विक्री होत आहे.