ठाणे : उन्हाच्या तडाख्यामुळे विद्यार्थ्यांच्या आरोग्यावर होणारा गंभीर परिणाम लक्षात घेता ठाणे जिल्हा परिषद शाळांच्या वेळेत महत्वपूर्ण बदल करण्यात आला आहे.
आज, १ एप्रिलपासून जिल्ह्यातील सर्व माध्यमाच्या व सर्व व्यवस्थापनांच्या शाळेची वेळ सकाळच्या सत्रात प्राथमिक शाळांसाठी सकाळी ७ ते ११.१५ वेळापत्रक तयार करण्यात आल्याबाबतची माहिती शिक्षणाधिकारी (प्राथमिक) बाळासाहेब राक्षे यांनी दिली तर माध्यमिक शाळांसाठी ७ ते ११.४५ वेळापत्रक तयार करण्यात आल्याबाबतची माहिती शिक्षणाधिकारी (माध्यमिक) ललिता दहितुले यांनी दिली आहे.
उन्हाळ्यात विद्यार्थ्यांनी मैदानी/शारीरिक हालचाली टाळाव्यात. बाहेर मैदानात वर्ग घेऊ नयेत. विद्यार्थ्यांना उष्णतेच्या लाटेपासून बचाव करण्यासाठी शिक्षित करावे. वर्गामध्ये पंखे सुस्थितीत असल्याची खात्री करावी. विद्यार्थ्यांना थंड पाणी उपलब्ध करुन द्यावे. टरबूज, खरबूज, संत्री, द्राक्षे, अननस, काकडी, कोशिंबिर तसेच स्थानिक उपलब्ध फळे आणि भाज्या यासारखी उच्च पाणी सामग्री असलेली हंगामी फळे आणि भाज्या खाव्यात. पातळ, सैल, सुती आणि शक्यतो हलक्या रंगाचे कपडे घालावेत. डोके झाकून ठेवण्यासाठी छत्री, टोपी, टॉवेल आणि इतर पारंपारिक साधनांचा वापर करावा. उन्हात बाहेर जाताना शूज किवा चप्पल घालावी आणि शक्यतो उन्हात बाहेर पडणे टाळावे, अशा सूचना प्रशासनाने केल्या आहेत.