ठाण्यात पदपथांवर दिवाळी; एलईडी दिव्यांची रांगोळी!

आनंद कांबळे/ठाणे
दिवाळीच्या मुहूर्तावर शहरातील पदपथांवरील जुने एलईडी आणि सोडीयम व्हेपरचे दिवे बदलून त्याजागी नवीन एलईडी दिवे बसवण्यात येणार आहेत. त्यामुळे दिवाळीत रस्ते नेत्रसुखद प्रकाशात न्हाऊन निघणार आहेत.
ठाणे शहरातील पदपथांवर सोडियम व्हेपर आणि एलईडीचे दिवे आहेत. त्यांचे आयुर्मान संपलेले आहे. सुमारे नऊ ते दहा वर्षांपूर्वी हे दिवे शहरातील पदपथांवर बसविण्यात आले होते. त्यांच्या दुरुस्ती आणि देखभालीचा खर्च वाढला आहे. तसेच प्रकाशाची तीव्रताही योग्य नव्हती, त्यामुळे महापालिका आयुक्त अभिजित बांगर यांनी शहरातील पथदिवे बदलण्याची योजना तयार केली होती. ही कल्पना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना सांगण्यात आली होती. त्या योजनेला लागणारा १५ कोटींचा निधी महापालिकेकडे नसल्याने मुख्यमंत्री श्री. शिंदे यांनी त्यांच्या विशेष निधीतून ठाणेकरांना दिवाळी भेट म्हणून तो निधी दिला आहे.
या निधीमधून शहरातील सर्व पथदिवे बदलून त्या जागी एलईडी दिवे बसविले जाणार आहेत. त्यामुळे शहरातील प्रदूषण कमी होणार आहे, वीजेचे बिल देखिल कमी होणार असून शीतल प्रकाशात ठाणे उजळून निघणार आहे.
ठाणे महापालिका हद्दीत सुमारे ४३,५०० पथदिवे आहेत. त्यापैकी सोडीयम व्हेपरचे ५०३८ दिवे आहेत. दहा वर्षापूर्वीच्या जुन्या एलईडी दिव्यांची संख्या ८२५० इतकी आहे तर चांगल्या स्थितीतील एलईडी दिव्यांची संख्या सुमारे तीस हजार आहे.
पहिल्या टप्प्यात महापालिका ५०३८ सोडीयम व्हेपरचे दिवे तसेच मंद प्रकाश देणारे ८२५० एलईडी दिवे बदली करून त्या जागी नवीन चांगल्या नामांकित कंपनीचे एलईडी दिवे बसविणार आहे.
या कामाकरिता नऊ प्रभाग समिती स्तरावर निविदा काढण्यात आल्या आहेत. ठेका मिळाल्यानंतर देखभाल आणि दुरुस्तीची कामे देखिल त्या कंपनीला पुढील पाच वर्षे करावी लागणार आहेत, अशी माहिती महापालिका आयुक्त अभिजित बांगर यांनी ठाणेवैभवला दिली.
दरम्यान दिवाळीच्या मुहूर्तावर ठाणे शहराच्या वेशीवर असलेल्या दीपमाळेचे देखिल लोकार्पण होण्याची शक्यता आहे. मुंबईवरून ठाण्याकडे येताना आनंदनगर चेक नाका येथे रस्त्याच्या दोन्ही बाजूला २५ मिटर उंचीच्या दोन दीपमाळा उभारण्यात आल्या आहेत. त्याचे काम अंतिम टप्प्यात असून दिवाळीत त्याचे उदघाटन केले जाणार असल्याचे महापालिकेतील सूत्रांनी सांगितले.