दिवा रेल्वे क्रॉसिंग टळणार; २०२३ ला पूल सुरू होणार

ठाणे : दिवा रेल्वे उड्डाणपुलाच्या आड येणाऱ्या १८ इमारतींपैकी नऊ इमारती पाडण्यात आल्या असून उर्वरित नऊ इमारती निष्कसित करण्याचे नियोजन करण्यात आले आहे. मार्च 2023 पर्यंत पुलाचे काम पूर्ण होण्याची शक्यता असून धोकादायक रेल्वे क्रॉसिंगचा धोका टळणार आहे.

दिवा रेल्वे रुळ ओलांडताना यापूर्वी देखील अनेक अपघात झाले आहेत. त्यामुळेच खारीगाव रेल्वे क्रॉसींग उड्डाणपुलासारखा पुल या ठिकाणी देखील उभारण्याचे पालिकेने निश्चित केले होते. या पुलाचा ५० टक्के खर्च पालिका तर ५० टक्के रेल्वे करीत आहे. त्यानुसार महापालिकेकडील खर्चाचे काम ३८.९० कोटी इतके आहे. पुलाची पुर्व आणि पश्चिम बाजूकडील मिळून ७३९.१५ मीटर इतकी आहे. या पुलाच्या कामास जून २०१९ मध्ये कार्यादेश देण्यात आले असून आतापर्यंत २० टक्केच काम पूर्ण होऊ शकले आहे. कोरोनाचा फटका या कामालाही बसल्याचे पालिकेचे म्हणणे आहे. या पुलाच्या कामांतर्गत पूर्व आणि पश्चिम बाजूकडील जाण्या येण्यासाठी ७.४० मीटर रुंदीची मार्गिका तसेच पादचाऱ्यांसाठी २.५० मीटर रुंदीची दोन्ही बाजूस पदपथ तयार करण्यात येणार असल्याचेही पालिकेने स्पष्ट केले. परंतु या पुलाच्या पूर्व व पश्चिम बाजूस बहुमजली इमारती बाधित होत असल्याने पालिकेने पहिल्या टप्प्यात म्हणजेच मागील दिवाळीच्या आधी पूर्वेकडील नऊ इमारती पाडल्या होत्या. आता शिल्लक नऊ इमारतींमध्ये सहा इमारती या तळ अधिक चार मजले आणि तीन इमारती तळ अधिक एक मजल्याची आहे. एकूण १८ इमारतींमध्ये २२५ सदनिका बाधित होणार आहेत. त्यानुसार आता दुसऱ्या टप्प्यातील तोडक कारवाई दोन आठवड्यात सुरु केली जाणार असल्याचे पालिकेने स्पष्ट केले. येथील रहिवाशांचे एक महिन्याआधी इतरत्र पुनर्वसन करण्यात आल्याचेही पालिकेने स्पष्ट केले. त्यानुसार आता या कामाने आता खऱ्या अर्थाने वेग घेतला असल्याचे दिसत आहे. पालिकेच्या माध्यमातून पूर्वेकडील बाजूस पिलर उभारण्याचे कामही वेगाने सुरु आहे.

कोव्हीडनंतर आता या उड्डाणपुलाच्या कामाला गती देण्यात आली असून युद्धपातळीवर काम सुरू करण्यात आले आहे.. या पुलाचे काम मार्च २०२३ पर्यंत पूर्ण करण्याचे महापालिकेचे प्रयत्न आहेत, असे नगर अभियंता प्रशांत सोनाग्रा यांनी सांगितले.