ठाणे: लोकायुक्तानी दिलेल्या आदेशानंतरही अनधिकृत बांधकामावर कर आकारणी व पाणीपुरवठा करण्यात आला असून संबंधित जबाबदार अधिका-यांवर कारवाई करण्याची मागणी आज ठाणे शहर काँग्रेसच्या वतीने करण्यात आली आहे.
ठाणे शहर काँग्रेसच्या वतीने एका पत्रकार परिषदेचे आयोजन करण्यात आले होते. याप्रसंगी शहर काॅग्रेस अध्यक्ष ॲड.विक्रांत चव्हाण यांच्यासह काँग्रेसचै मुख्य प्रवक्ते सचिन शिंदे, जेष्ठ उपाध्यक्ष भालचंद्र महाडिक, प्रवक्ते राहुल पिंगळे, महिला अध्यक्षा स्मिता वैती आणि मंजूर खत्री आदि पदाधिकारी उपस्थित होते.
या प्रसंगी बोलतांना काँग्रेस शहराध्यक्ष अँड.विक्रांत चव्हाण यांनी सांगितले, अनधिकृत बांधकामावर आळा बसावा म्हणून लोकायुक्त यांच्याकडे तक्रार केली होती. आमच्या या तक्रारींची दखल घेऊन लोकायुक्त यांनी महानगरपालिकेला आदेश दिले होते की,अनधिकृत बांधकामावर यापुढे पाणीपुरवठा, कर आकारणी तसेच वीजपुरवठा करण्यात येऊ नये परंतु लोकायुक्तांनी दिलेल्या आदेशानंतरही मागील दोन वर्षांत झालेली सर्वच अनधिकृत बांधकामे पूर्ण झाल्यानंतर त्यांना करआकारणी आणि पाणीपुरवठा करण्यात आलेला आहे. आताही नवीन आयुक्तांनी पुन्हा एकदा याबाबत सर्व सहाय्यक आयुक्तांना आदेश दिले आहेत. मात्र मागील दोन वर्षांत शेकडो अनधिकृत बांधकाम झालेल्या इमारतींना पाणीपुरवठा, कर आकारणी करण्यात आली. याची पूर्ण चौकशी करण्यात यावी व याकाळात जे जे अधिकारी होते, त्यांना जबाबदार धरण्यात येऊन त्यांच्यावर कारवाई करण्यात यावी जर कोणी निवृत्त झाले असतील तर त्याची पेन्शन थांबविण्यात यावी, अशी मागणी केली आहे. आज आम्ही आयुक्तांची भेट घेऊन पत्राद्वारे मागणी केलेली आहे. याबाबत योग्य भूमिका आयुक्तांनी घेतली नाही तर काँग्रेस रस्त्यांवर उतरून आंदोलन करेल, असा इशारा त्यांनी शेवटी दिला.