‘अलर्ट नवी मुंबईकर’ उपक्रमाचे उदघाटन
नवी मुंबई : गुन्हा किंवा अपघात घडल्यावर त्वरित प्रतिसाद (गोल्डन हवर) अत्यंत महत्वाचा आहे. या साठी ११२ क्रमांक महत्वाची भूमिका बजावू शकतो, असे प्रतिपादन पोलीस महासंचालक कुलवंत सरंगल यांनी वाशीत केले. अलर्ट नवी मुंबईकर उपक्रमाच्या उद्घाटनासाठी ते आले असता त्यांनी पोलीस मदतीसाठी ११२ या क्रमांकाचे महत्व विशद केले.
डायल ११२ या आतपत्कालीन वेळेत मदतीसाठी एकाच क्रमांक सुरू होऊन एक वर्षापेक्षा अधिक काळ झाला आहे. मात्र सध्या केवळ पोलीस सेवेसाठी याचा उपयोग होणार आहे. त्याच्या प्रसिद्दीसाठी नवी मुंबई पोलिसांनी “अलर्ट नवी मुंबईकर” हा उपक्रम हाती घेतला आहे. याचे उद्घाटन पोलीस महासंचालक कुलवंत सरंगल यांच्या हस्ते वाशीत करण्यात आले.
महासंचालक कुलवंतसिह यांनी माहिती देताना सांगितले की ११२ क्रमांक सुरू झाला असला तरी १०० क्रमांक बंद झालेला नाही. भारत एवढा मोठा देश असूनही आपत्कालीन वेळेत एक युनिक क्रमांक नाही यासाठी अमेरिकेच्या धर्तीवर हा क्रमांक सुरू करण्यात आला आहे. ग्रामीण भागात प्रतिसाद वेळ जास्त आहे त्यात सुधारणा करण्याचा प्रयत्न सुरू आहे. यात एनालीसेस करण्याची ही सुविधा असल्याने प्रत्येक प्रकारच्या समस्येवर उपाययोजना करता येणे शक्य होत आहे.असे कुलवंत सरंगल यांनी सांगितले.
यावेळी नवी मुंबई पोलीस आयुक्त मिलिंद भांबरे यांनी सांगितले , मी स्वतः याच डिजी ऑफिस मध्ये काम केले. हा उपक्रम अत्यंत महत्वाचा असून केंद्र शासनाचा हा उपक्रम आहे. देशात कुठेही असा या क्रमांकावर फोन करून मदत मिळवू शकता. नवी मुंबईतील प्रतिसाद वेळ ( रिस्पॉन्स) अजून कमी करण्याचा प्रयत्न आहे. या साठी मायक्रो लेव्हलवर काम सुरू आहे. फोनऐवजी समाज माध्यमातूनही संपर्क साधता येऊ शकतो. याच्या जनजागृतीसाठी अजून उपक्रम राबविण्यात येणार आहे. यावेळी अतिरिक्त आयुक्त संजय मोहिते, महेश घुर्रे, उपायुक्त पंकज डहाणे, विवेक पानसरे आदी उपस्थित होते.
ही सेवा सुरू होऊन एक वर्ष झाले आहे. याचे अधिकृत उद्घाटन एप्रिलमध्ये झाले आहे. येथे फोन केल्यावर आतापर्यंत सर्वात कमी वेळेत घटनास्थळी पोहचण्याचा वेळात (क्विक रिस्पॉन्स) नवी मुंबई राज्यात दुसऱ्या क्रमांकावर आहे. नवी मुंबईचा वेळ ५ ते ६ मिनिटे आहे.याच्या जनजागृतीसाठी तीन दिवसीय कार्यक्रम आखण्यात आला आहे. सहा गाड्या विविध भागात यासाठी उपलब्ध करून दिल्या आहेत.