गट शेतीतून होणार शेतक-यांचा विकास

गुजरात येथील अभ्यास दौऱ्याने शेतकरी झाले सकारात्मक

शहापूर: शेतकऱ्यांनी स्वतःची जमीन स्वतः न कसता अनेक शेतकऱ्यांनी एकत्र येऊन शेती शिवारातील संलग्न भौगोलिक क्षेत्रामध्ये सामूहिकरित्या शेती केल्यास शेतकऱ्यांचा आर्थिक विकास होण्यास मदत होईल, असे मत तालुका कृषी अधिकारी सूर्यकांत कांबळे यांनी व्यक्त केले.

गुजरात येथे शेतकऱ्यांच्या अभ्यास दौऱ्यावेळी शेतकऱ्यांना शासनाच्या विविध योजनांची माहिती देतांना ते बोलत होते. कल्याण कृषी अधिकारी कार्यालयामार्फत एकात्मिक फलोत्पादन विकास कार्यक्रमाअंतर्गत सहा दिवसांचा राज्याबाहेरील शेतकरी अभ्यास दौरा गुजरात येथे आयोजित करण्यात आला होता. उपविभागीय कृषी अधिकारी कल्याण कार्यालयाच्या अखत्यारीत असलेल्या शहापूर, कल्याण, मुरबाड, भिवंडी आणि अंबरनाथ या पाच तालुक्यांतील 25 शेतकऱ्यांची निवड करण्यात आली होती. यावेळी नवसारी कृषी विद्यापीठ, आनंद कृषी विद्यापीठ, आयसीएआर व प्रक्षेत्र भेट देऊन शेतकऱ्यांनी माहिती घेतली. विशेष म्हणजे माणिकपूर विविध कार्यकारी खेडूत सहकारी मंडळाने गट शेतीतून संपूर्ण गावाचा विकास केल्याचे प्रत्यक्षदर्शी पहावयास मिळाले. ड्रॅगन फ्रूट आणि त्यामधील आंतरपीक, पपई लागवड व त्यामधील आंतरपिकाचे नियोजन याबाबत माहिती मिळाली.

येथील कृषी विद्यापीठामध्ये प्रत्येक क्षेत्रातील शास्त्रज्ञासोबत असल्याने सर्व विषयांचे शेतकऱ्यांना मार्गदर्शन मिळाले. मधुमक्षिका आणि सर्प यांचे शेतकऱ्यांच्या आयुष्यातील महत्व समजले. नवसारी येथील कृषी विज्ञान केंद्रात भाजीपाला लागवडीचे तंत्रज्ञान मिळाले. अमूल डेअरी, म्युझियम, औषधी वनस्पती, कलमे बांधण्याची पद्धत, मसाला पिके तर पशुसंशोधन केंद्रामध्ये गाईंच्या जाती व संगोपनाबाबत सखोल माहिती मिळाली. दरम्यान या दौऱ्यासाठी कल्याण तालुका कृषी अधिकारी सूर्यकांत कांबळे व शहापूर कृषी सहाय्यक सचिन भालेराव यांनी विशेष परिश्रम घेतले. दरम्यान या शेतकरी अभ्यास दौऱ्यामध्ये बबन हरणे, विलास धानके, सुभाष पाटील, अशोक मोपे, डॉ.विलास सुरोशे, विनायक पोटे, राजेश जागरे, दशरथ भोईर, सतिष मडके, विनोद पाटील, के. डी.चौधरी, गुरुनाथ भावार्थे, भानुदास जाधव, आत्माराम मिरकुटे, चंद्रकांत मते, संदीप वडवले, देवेंद्र भोईर, विश्वनाथ धुमाळ, विलास सुरोसे, सचिन पाटील, तात्या हंबीर आणि गौतम बचुटे आदी शेतकरी सहभागी झाले होते.

*शेती शाश्वत व किफायतशीर होण्यासाठी एकट्याने शेती करण्यापेक्षा शेतकऱ्यांनी एकत्रित येऊन गटशेती करावी. गटांमार्फत राज्यात यशस्वी शेतकरी उत्पादक कंपन्या तयार व्हाव्यात यावर राज्यशासनाचा भर आहे. गटशेती संदर्भात काही मार्गदर्शन लागल्यास शेतकऱ्यांनी संपर्क साधावा, असे आवाहन कल्याण तालुका कृषी अधिकारी सूर्यकांत कांबळे यांनी केले आहे.