शिवजन्मोत्सव सोहळ्यात उपस्थित राहणार शिवरायांच्या शिलेदारांचे वंशज

भिवंडीः छत्रपती शिवाजी महाराज जयंतीच्या निमित्ताने शिवक्रांती प्रतिष्ठानतर्फे बांधकाम सुरु असलेल्या महाराष्ट्रातील पहिल्या छत्रपती शिवाजी महाराज मंदिरात महाराजांच्या शिलेदारांच्या वंशजांच्या प्रमुख उपस्थितीत भिवंडीतील मराडेपाडा येथे शिवजन्मोत्सव सोहळा पार पडणार आहे.

सोमवारी मराडेपाडा येथील छत्रपती शिवाजी महाराज मंदिर येथे सकाळी ९ ते रात्री १० या वेळेत या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. यावेळी स्वराज्याचे सरसेनापती हंबीरराव मोहिते यांचे वंशज सरसेनापती जयाजीराव मोहिते, स्वराज्याच्या पायदळाचे प्रमुख. सरसेनापती येसाजी कंक यांचे वंशज सरसेनापती सिद्धार्थ दादा कंक, स्वराज्याचा तिसरा डोळा म्हणून ओळखले जाणारे स्वराज्याचे गुप्तहेर बहिर्जी नाईक यांचे वंशज दादासो नाईक, स्वराज्याचे पहिले सरसेनापती प्रतापराव गुजर यांचे वंशज सयाजी राजे गुजर, प्रतिशिवाजी म्हणून सिद्धी जोहरच्या समोर जाऊन स्वतः मरण पत्करले आणि राजांना या वेढ्यातून सुटका करून दिली असे नरवीर शिवा काशीद यांचे वंशज आनंदराव काशीद, इतिहासात गाजलेल्या लढाईंपैकी कोंढाणा गडावरची लढाईत वीरमरण आलेले सुभेदार तानाजी मालुसरे यांचे वंशज शितल मालुसरे ह्या महाराज्यांच्या गळ्यातील  कवड्याची माळ घेऊन शिवजयंती सोहळ्यात उपस्थित राहून महाराजांच्या पराक्रमाची आणि आपल्या वंशजांची महती सांगणार आहेत.

यावेळी महिलांसाठी विविध कार्यक्रम तसेच महाआरोग्य शिबीर देखील राबविण्यात येणार आहे. शिवक्रांती प्रतिष्ठानतर्फे दरवर्षी विविध कार्यक्रमाचे आयोजन करण्यात येते. यंदाही हे प्रतिष्ठान शिवजन्मोत्सवानिमित्त विशेष कार्यक्रम घेणार आहे. शिवज्योत पेटवुन महाआरती करुन कार्यक्रमाला सुरुवात होणार आहे. त्यानंतर १० ते २ च्या वेळेत महाआरोग्य शिबीराचे आयोजन करण्यात आले आहे. याशिवाय दुपारी ३ ते ४ या वेळेत महिलांसाठी हळदीकुंकू व ४ ते ५ या वेळेत शैलेश मांजरेकर यांचा होम मिनीस्टर कार्यक्रम सादर करण्यात येणार आहे. संध्याकाळी ५ ते ६.३० वाजता परिसरातील नवोदित उगवते शिवव्याख्याते यांचे व्याख्यान तद्नंतर ७ ते ८.३० पुणे येथील सुप्रसिध्द शिवव्याख्याते प्रा.प्रदीप कदम यांचे व्याख्यान होणार आहे. संध्याकाळी ८.३० ते ९ वाजता विविध क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी करणा-या गुणवंत व्यक्तींचा शिवक्रांती पुरस्काराने जाहीर सत्कार करण्यात येणार असून या कार्यक्रमाला नागरिकांनी मोठ्या प्रमाणात उपस्थिती लावावी, असे आवाहन शिवक्रांती प्रतिष्ठान संस्थापक राजु चौधरी यांनी केले आहे.