आ.संजय केळकर यांनी आयुक्तांना विचारला जाब
ठाणे: घोडबंदर परिसरातील धर्मवीरनगर येथील तुळशीधाम भागात महापालिकेची जागा बळकावून चक्क कंटेनर शाखा उभारण्यात आली आहे. हा कंटेनर तत्काळ हटवावा अन्यथा त्याशेजारीच प्रतिकात्मक दोन कार्यालये थाटण्याचा इशारा आ. केळकर यांनी मंगळवारी पत्रकार परिषदेत दिला.
अनधिकृत बांधकामांवर कारवाई करण्याचे आदेश दस्तुरखुद्द मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी देऊनही ठाणे शहरात राजरोसपणे अनधिकृत बांधकामे सुरु असल्याचा भंडाफोड आमदार संजय केळकर यांनी पुराव्यानिशी ठामपा आयुक्त अभिजीत बांगर यांच्यासमोर केला आहे.
शहरात अनधिकृत बांधकामांचे स्तोम माजल्याने भाजप आ. संजय केळकर यांनी शहरातील अनधिकृत बांधकांबाबत वारंवार आवाज उठवला असुन अधिवेशनात देखील लक्षवेधीद्वारे प्रश्न उपस्थित केले होते. मंगळवारी शहरातील विविध भागातील नागरिकांनी सचित्र केलेल्या तक्रारींचा लेखाजोखा मांडत आ. संजय केळकर यांनी महापालिका आयुक्त बांगर यांना जाब विचारला.
अनधिकृत बांंधकामांवर कारवाईचे आदेश दिले जातात. परंतु निर्ढावलेले अधिकारी कारवाई न करता केवळ मुग गिळुन बसतात. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी तर ठाणे शहरासह सर्व महापालिकांमध्ये अनधिकृत बांधकामे होणार नाहीत आणि झाली तर या बांधकामांवर कारवाई होईल. शिवाय बांधकामांना पाठिशी घालणाऱ्या संबंधित अधिकाऱ्यांवर फौजदारी गुन्हे दाखल करण्यात येतील, असे सभागृहात सांगितले होते. ही घोषणा हवेत विरता कामा नये, अशा अनधिकृत बांधकामांवर प्रत्यक्षात कारवाई होणे गरजेचे असल्याचे आ. केळकर यांनी बजावले.
धर्मवीरनगर येथील तुळशीधाम येथे २०२१ साली याच जागेवर कपाऊंड टाकुन लोकोपयोगी मुलभूत सोयी-सुविधांसाठी वापर करण्याची सूचना केली होती. महापालिकेनेही या ठिकाणी स्वतःचा फलक लावुन अतिक्रमण न करण्याचे निर्देश दिले होते. तरीही २४ जानेवारी रोजी या ठिकाणी भलामोठा कंटेनर ठेऊन २७ जानेवारी रोजी त्यावर झेंडा आणि फलक झळकवण्यात आल्याचे आयुक्तांच्या निदर्शनास आणले. आयुक्तांनी तत्काळ फोनाफोनी करून कारवाईचे आदेश दिल्याचे आ. केळकर यांनी सांगितले.
राजरोसपणे अतिक्रमण करण्याची इतकी हिंमत होतेच कशी? तातडीने ही अनधिकृत कंटेनर शाखा हटवावी, अन्यथा याच ठिकाणी दोन प्रतिकात्मक कार्यालये थाटण्याचा इशारा आ. केळकर यांनी दिला आहे.